''अशीच रीत असते, आपल्याकडे हीच पद्धत आहे, असंच करावं लागतं"....

 


सणा-वारांविषयी माझ्या मनात पहिल्यापासून एक बंडखोरी आहे. 

आई सोवळ्यात असताना थेट अंथरुणातून उठून तिला मिठी मारणं, नैवेद्य दाखवायच्या आधी पदार्थ खाणं, मासिक पाळीत बाजूला बसलेल्या बाईला मुद्दाम शिवणं, अंघोळ न करता गणपतीच्या आरतीला उभं राहणं, सत्यनारायणाला नमस्कारच न करता थेट प्रसादासाठी हात पुढं करणं, चांगल्या कार्यक्रमाला काळे कपडे घालणं, उपवासाच्या दिवशी अंडी खाणं ही यादी बरीच मोठी आणि गंभीर होत जाऊ शकते. 

मुद्दा हा आहे की 'हे करायचं असतं' म्हणलं की 'मी नाही करत जा' हे ठरलेलं आहे. 

परवा दसऱ्याला मला पर्याय होता, दाराला तोरण लावण्याचा किंबहुना न लावण्याचा. पण मला दसरा म्हणाल्यावर काय आठवत होतं?, आम्ही भावंडांनी मिळून केलेल्या झेंडूच्या माळा, आईनं चक्का टांगून केलेलं केशर श्रीखंड, दिवाळीची चाहूल देणारे नवेनवे कपडे, एकत्र जेवण, लोळून काढलेली दुपार आणि संध्याकाळभर गल्लीत फिरून दिलेलं सोनं, घरात सोनं घेऊन येणारी आजूबाजूची चिल्लीपिल्ली. ...

या सगळ्यामध्ये न पटण्यासारखं , न आवडण्यासारखं काहीच नाही. संक्रांतीबद्दल पण हेच, गणपतीचं पण हेच, नवरात्री-होळी-दिवाळी-आषाढी... सगळ्याविषयी हेच. 

सौंदर्य, संगीत, सहभोजन यात खटकण्यासारखं काय आहे?

आणि मग तरीही मग माझ्यामध्ये ही बंडखोरी कुठून आली? तिचं मूळ काय? 

हे सगळं नाकारून फक्त माझं मन शांत होत नाही तर जे ''करू नये'' म्हणून सांगतात ते करून दाखवायची माझी तयारी असते. हा असा सणांविषयीचा सुप्त द्वेषच माझ्यात आलाय कुठून?

खूप विचार केल्यावर मला त्याचं मूळ सापडलं. एकंदरीत सणा- वारांविषयीचा द्वेष, संसारिक गोष्टीतील निरुत्साह, हौस- श्रद्धा यांचा अजिबात अभाव... या सगळ्यांचं कारण माझ्या सगळ्या नात्यातल्या, ओळखीच्या तायांमध्ये आहे. माझ्या कळत्या वयात मी या सणा- वारांच्या दिवशी माझ्या तायांना राबताना पाहिलं, 

''अशीच रीत असते,आमच्यात असंच असतं, हे करावंच लागतं, आपल्यात हीच पद्धत आहे" अशी वाक्यं ऐकत त्या हे सण समारंभ करत राहिल्या. 

पहाटे उठून रांगोळी काढणारी पण तीच, सगळ्यांचा चहा करणारी पण तीच, सगळ्यात आधी अंघोळ करणारी पण तीच, मिक्सर असताना पाट्यावर पुरण वाटणारी तीच, सोवळ्यात स्वैपाक करणारी तीच, वाढणारी तीच, खरकटं उचलणारी तीच, दुपारी सगळे खाऊन पिऊन आडवे झाले की बाईला भांडी काढून देणारी तीच आणि सणासुदीला यांच्या गप्पा रंगल्या की वेळी अवेळी चहा- कॉफी टाकणारी पण तीच. 

तिला दमायला वेळ नाही, थकलेल्या चेहऱ्यानं बसून राहायला परवानगी नाही... सण आहे ना !! त्यामुळं तिनं साडी पण नेसली पाहिजे, दागिने पण घातले पाहिजेत, रांगोळी पण काढली पाहिजे, पक्वान्नाचा स्वैपाक पण केला पाहिजे, कुणाला काही मागायला लागता कामा नये असं छान तिनं वाढलं पण पाहिजे, हसत खेळत यांच्या गप्पात सामील पण झालं पाहिजे.  

माहेरी असली काय, सासरी असली काय, पाहुण्यांकडे असली काय माझी ताई आपली सगळीकडे पदर खोचून उभीच, सतत कामातच.. ती कायमच कशी शेवटच्या पंगतीला जेवते?

या रूढी-परंपरा, सणवार, उपास तापास, देव धर्म अशा रूपातून आलेल्या हट्टी, आग्रही, माजुरड्या, क्रूर, पितृसत्ताक संस्कृतीसमोर मी माझ्या या नात्यातल्या, ओळखी-पाळखीच्या तायांना सतत शरणागती पत्करताना पाहिलं, हतबल झालेलं पाहिलं. 

त्या देखील नटल्या, हसल्या, रमल्या... नाही असं नाही. 

पण हे सगळे निर्णय त्यांचे होते? त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या वेळी, त्यांनी स्वखुशीने केलेल्या निवडीच्या वेळी त्यांच्यासमोर पर्याय होते? आणि असतील तर ते कुठले होते? 

झेंडूच्या फुलांचं तोरण करून दरवाजाला लावायचं की नाही, कधी लावायचं? हे पर्याय आज माझ्याकडे उपलब्ध होते. माझ्या तायांच्याकडे हे पर्याय होते?

त्या रमल्या की हरवून गेल्या? त्यांच्यासाठी हे सण फक्त सहज स्वाभाविक सौंदर्य, संगीत आणि सहभोजन होतं? 

त्याग, सहनशक्ती यांना दिलेलं अनावश्यक महत्व, तिच्या कर्तव्यांचं केलेलं अवडंबर, आणि संस्कारांच्या नावाखाली तिला कमजोर बनवणारं तिचं माहेर... हे मूळ आहे माझ्या बंडखोरीचं... ही साखळी माझ्यापाशीच तुटली तर किती बरं होईल?

आपले सण सौंदर्य, संगीत, सहभोजन आणि सजण्या-सवरण्याचे आणि संपूर्ण ऐच्छिक झाले तर किती बरं होईल?  


माझी नशेची लिस्ट वाढतच चालली आहे. दारू, देव आणि आता डेली सोप..

 


शाळेत असताना मी मालिका बघायचे. आमच्या घरी टीव्ही नव्हता तेव्हा शेजारी आजोबांकडे जाऊन बघायचे. सध्याच्या चालू मालिका बघता 'मी पूर्वी मालिका बघायचे' हे सांगण्याची सोय राहिलेली नाही. पण खरंच बघण्यासारख्या मालिका तेव्हा बनत होत्या. 'झोका' पासून 'साराभाई vs साराभाई' पर्यंत बरीच मोठी लिस्ट होऊ शकेल. 

आजच big bang theory बघून पूर्ण केली. 

मालिका.. म्हणजे टीव्ही किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म कुठल्याही माध्यमातून माझ्यापर्यंत येणाऱ्या. 

मालिकांमधून मिळणारा आनंद, मनोरंजन, विचार या सगळ्या गोष्टी एका बाजूला. म्हणजे त्या आहेतच. पण मला वाटतं मालिका या प्रकारामध्ये एक प्रकारचं हिप्नॉटीझम आहे.  माझं मानसिक, बौद्धिक रिकामपण, घरातलं एकटेपण यावर एक पर्याय म्हणून मी मालिका बघत राहते. उद्यासाठी काही प्लॅन नसणं, भविष्यासाठी ध्येय नसणं, सातत्यानं जपलेला छंद नसणं- अशा जाणीवा टाळण्यासाठी माझी बुद्धी गोठून राहणं गरजेचं असतं आणि ते काम या मालिका करत असाव्यात. वेळेचा विसर पडायला मदत करणाऱ्या, बुद्धीला गुंतवून ठेवणाऱ्या, वास्तवापासून वेगळ्या जगात घेऊन जाणाऱ्या या मालिका म्हणजे एक नशा, एक व्यसन तर नाही ना? 

मालिका नसतील तर माझा वेळ जाईल? 

स्वतःला टाळण्यासाठी मी मालिकांमध्ये डोकं खुपसून बसते का? 

एक मालिका संपली की मला रिकामपण येतं. शेवटच्या एपिसोडला मी अस्वस्थ होते. पुन्हा नवीन मालिका बघायला सुरु करेपर्यंत अस्वस्थता कायम राहते. 

माझी नशेची लिस्ट वाढतच चालली आहे. दारू, देव आणि आता डेली सोप...म्हणजे मालिका....

एकामागोमाग एक season वर season बघताना मी वर्तमानापासून पळत असते काय? 

मालिकेशिवाय काही दिवस, महिने मी रहायचं ठरवलं आहे. त्या प्रयोगाचं काय होतंय यावर तेव्हा पुन्हा लिहीन. 

मंगळसूत्र गरजेचं वा पुरेसं नसतं!

 


" प्रतिकांची निर्मिती " हे मनुष्याच्या आत्तापर्यंतच्या प्रवासातलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. पण त्या प्रवसातलं पुढचं पाऊल आपल्याला अजून टाकता आलेलं नाही. 


आपल्याला न सुटलेल्या कोड्याचा धनी म्हणून आपण ' ईश्वर ' नेमला, मग त्याची मूर्ती बनवली - त्याला सगुण - साकार केलं, म्हणजे प्रतीक तयार केलं.  त्याच्यासमोर नम्र होण्यासाठी ' नमस्कार ' करून प्रतीकात्मक नात नतमस्तक झालो. पुजे- अर्चेच्या नावाने भक्ती केली. भक्तीच्या नावाने कर्मकांडं! हेही पुन्हा प्रतिकच. 


अजूनही आपल्याला प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाची गरज का भासावी ?


आपण हुशारीचं प्रतीक डिग्र्यांना मानतो, श्रीमंतीचं प्रतीक सोना- नाण्याला..
पुरस्कारांची प्रतिकं असतात, अपमानासाठी चपलांचा हार असतो ! गळ्यात मंगळसूत्र - प्रतीकाचं , डोक्यावर टोपी - कोणाच्यातरी नावाची, झेंडे - वेगळ्या रंगाचे, वेगळ्या जातीचे -

ईश्र्वराशी भक्ती, माणसावरचं प्रेम, आदर, विश्वास, कौतुक यासाठी आपण वापरत असलेली प्रतिकं आणि याशिवाय  जगण्यामधली वस्तूंची निखळ गरज यामधलं वेगळेपण आपल्याला अजून समजत नाही.

म्हणजे गळ्यातलं मंगळसूत्र नवरा बायकोंमध्ये मित्रत्वाचं नातं निर्माण करण्यासाठी गरजेचं वा पुरेसं नसतं, हे अजून कळलं नाही आपल्याला ?


प्रतीकांची गरज मला का भासावी ? माझ्या आचरणातून माझ्या अंतरंगात भिनलेली भक्ती, प्रेम, निष्ठा का दिसू नये?
"प्रतिकांशिवाय व्यक्त होणे" हे ते पुढचं पाऊल होऊ शकेल काय?


दारू आणि देव या दोन्ही नशाच!


तुझं अस्तित्व जाणवण्याइतका वेळच सध्या मला मिळत नाही. 'देव सगळं बघतोय' असं आजी म्हणायची. मला ते खरं वाटायचं. त्याच्याकडं सतत काहीतरी मागत राहणं हे देवाशी असलेलं माझं सुरवातीचं नातं होतं. वाईट वागताना 'देव बघतोय' असं वाटायचं पण तेही अगदी लहानपणी पुरतं. मग मी दुनियादारीच्या नावाखाली निर्ढावत गेले. 

हळूहळू देवाचं स्वरूप बदललं. त्याचं अस्तित्व हळूहळू मोठं मोठं होत गेलं, आणि माझं कमी. त्यामुळंच की काय, सगळ्या गोष्टींची जबाबदारी देवावर येत गेली. कारणही तोच, परिणामांना जबाबदारही तोच ! मग सगळंच रामभरोसे होत गेलं आणि मी निष्क्रिय होत गेले. 

दारू आणि देव या दोन्ही नशाच! आपल्याला धुंद राहण्याची, निष्क्रिय राहण्याची मोकळीक देणाऱ्या! दारूपेक्षा देव जालीम. कारण तो कोणालाही वर्ज्य नाही, त्यातून कोणाचीही सुटका नाही आणि त्याला व्यसन म्हणून मान्यताही नाही. 

आता मात्र तर्कांच्या मागं लागून मी त्याचं अस्तित्व विसरत चाललीय वा हळूहळू मिटवत चाललीय म्हणूया.. 

आजीची 'देव बघतोय' ही संकल्पना आणि तुकारामाचा 'देव होऊनिया आलो' हा दावा यांचा परस्पर संबंध असावा. स्वयंशिस्तीशी, आत्मपरीक्षणाशी त्याचा संबंध असावा. 

मी तर्काच्या आधारावर माझंच वागणं तोलून पाहिलं पाहिजे. 'देव बघतोय' म्हणजे 'मी बघतोय'. 

मी बघितलं पाहिजे, मी जबाबदारी घेतली पाहिजे.. मी माझ्या नजरेत 'देव' झालं पाहिजे. 

'कभी कभी लगता है की अपुनही भगवान आहे....' its a good start.. what say??

नवरा...





मी कात टाकती आहे हळूहळूू
आणि अंतर्बाह्य बदलतीय हळूहळू
तुझा मात्र काळा कोट, टोपी 
खुंटीवर अजूनही....

मी माझ्या आई सारखी नाही,
मी तुझ्या आई सारखी देखील नाही,
तू मात्र आजीच्या आठवणीतल्या 
आजोबांसारखा..

माझ्यासाठी फिरत राहिलं 
भिंतीवरचं घड्याळ,
तुझा लोलक हिप्पोक्रसीची
किल्ली संपली की बंद पडणारा...

माझा १५व्या मजल्यावरच्या
हौसेनं सजवलेला फ्लॅट -
आणि तरी त्या फ्लॅटच्या 
मेन डोअरशी तुला दिसतो 
एक उंबरा- मोठ्ठाच्या मोठ्ठा 
रांगोळीनं स्वस्तिक काढून 
हळदी कुंकू घातलेला....

लोक, रुढी, परंपरा...
तुझं समाजमान्य नवरेपण,
माझं मी मानलेलं बायकोपण,
याहून पलीकडे तुला मी कधी 
तुझी मैत्रीण वाटलेच नाही ?

स्वतः तल्या मित्रावर मात 
करणाऱ्या स्वतः तल्या 
नवऱ्यातलं नामर्दपण 
झाकण्यासाठी तू करत 
राहिलास अभिलाषा 
मुलगा होण्याची .. वंश वाढण्याची ..

तू माझा होऊ शकला नाहीस..
स्वतः वाढू शकला नाहीस...
तुझ्या जगण्याच्या चिखलानं
धोपट मार्गावर वाढली 
फक्त एक level _,
Level च नसलेली......

(माझ्या ब्लॉगचे नोटीफिकेशन मिळत राहण्यासाठी मेल आयडी देऊन सबस्क्राईब करा)

माणसाचं टू पॉइंट ओ वर्जन येईपर्यंत तंत्रज्ञानाची घौडदौड फ्रीझ केली तर?

 


सातची बस कधीच सात वाजता यायची नाही. आम्ही ताटकळत येईल त्या बसकडे आशेने पाहत असायचो. लाल डब्ब्याच्या ऐवजी हिरकणी यावी अशी मी मनात देवाकडं प्रार्थना करत असायचे. कारण हिरकणीच्या खिडकीशी माझी उंची पोचायची. 'आता येउदे कधी यायची तेव्हा' असं म्हणून आशा सोडून निवांत बसलं की एकदम राणीच्या थाटात धूळ उडवत ती लाल बस यायची. 7 आणि 8 अशा दोन बसच्या प्रवाशांची झुंबड मग या एकाच बससाठी. 

आई मला सांगायची, 'पटकन जा आणि तीन सीटची जागा पकड'. 

मी चालत्या बस सोबत चालत चालत दरवाजाशी थांबायचे. आपण पहिलेच आहोत म्हणजे जागा मिळणार म्हणून मी खुश. दरवाजा खडखड करत उघडायचा. आतले प्रवासी आधी उतरतील मग आपण आत चढू म्हणून मी उतरत्या प्रवाशांना जागा देत थोडी सरकून उभी राहायचे. तेवढ्यात माझ्या मागे थांबलेली माणसं उतरत्या प्रवाशांना धक्काबुक्की करत आत शिरायला लागायची. तिथं एकदम चेंगराचेंगरी सुरु व्हायची. माझा जीव गुदमरायचा. मी मागे पडायचे. आणि आम्हाला जागा पण मिळायची नाही. 

बऱ्याच वर्षांनी काही व्यावसायिक कामानिमित्तानं फाईव्ह स्टार हॉटेलला जाण्याचा प्रसंग आला.  तिथे 8-8 लिफ्ट होत्या. 15-20 सेकंद लिफ्टची वाट बघताना सुद्धा माझ्या आजूबाजूचे 10-12  जण उतावीळ झाले होते. लिफ्ट आली. मी रांगेत पहिल्या नंबरात होते. आतल्या लोकांना बाहेर येता यावं म्हणून मी थोडी जागा करून दिली. पण माझ्या मागचे लोक आत शिरले. संथ चालणाऱ्या त्या लोकांचा आतून बाहेर आणि बाहेरून आत हा ओघ एकत्रच सुरु झाला. माझा जीव गुदमरला. मी मागे पडले आणि मला ती लिफ्ट मिळालीच नाही. पुढच्या लिफ्टची वाट बघत मी दुसऱ्या लिफ्ट समोर जाऊन परत रांगेत उभी राहिले. 

शिवनेरी मध्ये प्रवास करताना फोनवर मोठ्याने व्हिडीओ लाऊन ऐकणारे प्रवासी कोणाकोणाच्या नशिबात आले आहेत? 

लहान मुलांना मांडीवर घेऊन कार चालवणारे महाभाग कोणी कोणी पाहिले आहेत?

अशा छोट्या छोट्या अनुभवापासून ते अणुबॉम्ब पर्यंत. त्या बॉम्बस्फोटानंतरची जपानची अवस्था, अणु बॉम्ब फेकणाऱ्या अधिकाऱ्याची त्या संहारानंतर पश्चातापातून झालेली अवस्था यावर काही लेख वाचनात आले तेव्हा पुन्हा पुन्हा जीव गुदमरतच राहिला. 

देशादेशांमध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चाललेली चढाओढ पाहिली की वाटतं, की हे तंत्रज्ञान वापरण्याची माणसाची लायकी आहे का? आधी आतल्या प्रवाशांना बाहेर उतरू द्यावं आणि मग आपण आत चढावं हो गोष्ट खेड्यातल्या लाल डब्यात चढणाऱ्यांना देखील कळत नाही आणि शहरातल्या फाईव्ह स्टार हॉटेलवाल्यांना देखील कळत नाही. 

आपण सगळ्या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करतो हे तर सिद्ध गोष्ट आहेच. पण आपण त्या तंत्रज्ञानाचा उपयोग- वापर देखील शहाणपणाने करत नाही. 

मंगळावर जाण्याची स्वप्न बघणाऱ्या, आर्टिफ़िशिअल इंटेलिजन्समध्ये झेंडे गाडायला निघालेल्या संशोधकांना, तज्ञांना, शास्त्रज्ञांना, त्यांना फंडिंग करणाऱ्यांना, शासनाला या सगळ्यापेक्षा मॅनहोल मध्ये माणसाला उतरावं लागू नये यासाठी काही तंत्रज्ञान प्राधान्याने शोधावं असं वाटत नाही??? 

माणसाचं टू पॉइंट ओ वर्जन येईपर्यंत तंत्रज्ञानाची घौडदौड फ्रीझ करता आली तर? तंत्रज्ञान कशासाठी असावं, कसं वापरावं याविषयी जागतिक पातळीवर काही उहापोह झाला तर? 

Thomas More चं युटोपिया वाचल्यापासून असे काहीबाही विचार मनात यायला लागलेत. 

(माझ्या ब्लॉगचे नोटिफिकेशन मिळत राहण्यासाठी मेल आयडी देऊन सबस्क्राईब करा.)


हाथरस केस

 


मी भाजी घेऊन घरी येत होते. गर्दीचा रस्ता,

दिवसा- उजेडी.. त्यांनी मला फरफटत नेलं. गर्दी बघत राहिली. मला ओरडता आलं नाही. मी घाबरलेले. आता वाटतं ओरडायला हवं होतं. कारण नंतर बुद्धिवान माणसं या घटनेची चर्चा करतील तेव्हा म्हणतील ' ती ओरडली का नाही?'.


त्या कळकट माणसांनी मला एका गावात नेलं. एका झोपडीवजा घरात. त्यांनी माझे बांधलेले डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात हवस नाही क्रोध दिसत होता. हे पण मी कुठेतरी लिहून ठेवायला हवं. कारण नंतर बुद्धिवान माणसं या घटनेची चर्चा करतील तेव्हा त्यांना हा वासनेपोटी घडलेला प्रसंग वाटेल. पण मला वासना दिसत नव्हती. तो क्रोध होता. 


त्यांच्या आया बहिणींना असच उचलून नेत आलेले. गावाबाहेर घर, वेगळी भांडी, विलग काम विलग दाम.. अस्वच्छ.. अस्पृश्य.. दुर्लक्षित अन्याय, नोंदी नसलेले गुन्हे.. गुन्हा म्हणून मान्यताच नसलेले गुन्हे.. त्यांच्या विरुद्ध घडत राहिले.. या सगळ्याचा क्रोध.. आणि मी समजूनच घेऊ शकणार नाही अशा असंख्य वंचनांचा क्रोध...


मी त्यांना म्हणाले, मला एक मिनिट बोलू द्या मग काय करायचं ते करा. ते शांत राहिले. 

मी त्यांना म्हणाले,


"स्त्री आणि क्षुद्र असा आपला एकत्र उल्लेख त्या लोकांच्या ग्रंथात आहे. बाई आणि बाटली म्हणून ते मला नशेसोबत जोडतात. मी त्यांची संपत्ती आहे, अब्रू आहे आणि गुलाम सुद्धा आहे. आपण एक व्हायला पाहिजे. आपला शत्रू एक आहे. '


त्यातला एक म्हणाला, "आधी का आली नाहीस? आमची बाजू घेण्यासाठी आम्ही तुला उचलून आणण्याची वाट बघत होतीस ? साली हिप्पोक्रेट.."


मी खडबडून जागी झाले.