प्रवाह

 

या प्रवाहात जागोजाग भोवरे आहेत. अभिमानाचे, संस्कारांचे, परंपरेचे, नीतीचे, भक्तीचे, धर्माचे..

नाव-आडनाव-आईवडील-कुटुंब-घराणं-भाषा-देश-खंड-रंग आणि यांचा इतिहास याचा अभिमान पाहिजे. उद्या वेगळ्या ग्रहावर मनुष्यसदृश जमात सापडली तर पृथ्वीचा अभिमान,

आईवडिलांनी, घराण्यांनी, मातृभाषेने, मायभूमीने दिलेले संस्कार नाकारायचे नाहीत,

कुटुंब तोडायची नाहीत,

परंपरा मोडायच्या नाहीत..

असे हे सगळे भोवरे.

अशा भोवऱ्यांत अडकलेल्या माणसांना वाटतं ते प्रवाहात आहेत. पण तो त्यांचा भ्रम असतो. आभासाला प्रवास समजतो आपण.

भोवऱ्यात आपला वेळ जातो, भोवऱ्यात आपल्याला सुरक्षित वाटतं, भोवऱ्यात झुंडच्या झुंड आपल्या सोबत असते...

माझ्या जगातल्या माणसांनी, संस्थांनी, कलांनी या सगळ्या भोवऱ्यांशी माझी रीतसर ओळख सतत करून दिलेली आहे. हे भोवरे सुरक्षितता देतात. आपल्या जिवंतपणामध्ये असलेल्या वेळेच्या पोकळीला भरण्याचं काम करतात. कधी अभिमानानं आपला ऊर भरून येतो, कधी अपमानाने आपण पेटून उठतो, कधी आपण जुनं जपायला जीव ओततो,  कधी कुटुंब अबाधित राखण्यासाठी आपण अगतिकता, लाचारी पत्करतो, लग्नसंस्थेला प्रेम समजतो, कर्तव्याच्या नावाखाली स्वत:चं मन मारत राहतो.. असेच कधीतरी प्रश्न पडायचे बंद होतात आणि भोवऱ्यामध्ये आपण स्थायिक होतो.

या सगळ्यात अडकून आपला प्रवास थांबतोय. स्वतःला शोधण्याचा... उत्क्रांतीचा... हे भोवऱ्यात अडकणं संपायला हवं...  

या सगळ्या सगळ्या प्रस्थापित भोवऱ्यांना आव्हान द्यायला पाहिजे, नवी मांडणी करायला पाहिजे.. जिथे अभिमान, परंपरा, मान अपमान असे शब्द नसतील, प्रेमाला सीमा नसतील, भावनेला किंमत असेल, माणसांची बुद्धी जिथे विशाल असेल, जिथे कोणी उपाशी राहणार नाही आणि कोणी पोट जड होईपर्यंत खाणार नाही, जिथे साठेबाजी नसेल, प्रतिष्ठा- वंश-धर्म-भाग्य अशा संकल्पना जिथे अस्तित्वात नसतील.. जिथे तंत्रज्ञान कुरघोडीसाठी नाही तर माणसाच्या सहाय्यासाठी, सुसह्यतेसाठी वापरलं जाईल... जिथे खरा खरा इतिहास सांगितला जाईल आणि स्वीकारला जाईल, जिथे सत्याला सुंदर म्हणलं जाईल आणि जिथे माणसाची स्वीकारार्हता निसर्गासारखी विशाल असेल... अशी काहीतरी नवी मांडणी आपण करायला हवी.

‘प्रस्थापित लोप पावावं’ हे मला पटलेलं आहे हे खरंय. पण मला ठोस पर्याय सापडलाय असं मी म्हणणार नाही. मी भोवऱ्यातून सुटू पाहतीय एवढं खरं. प्रवाहात उतरतीय एवढं खरं. इतकं (म्हणजे कितकं हेही मला माहित नाही) पोहत राहण्याची माझी क्षमता आहे का याची मला खात्री नाही. एकटेपणाची सवय अजून मला झालेली नाही. सुखाचे, समाधानाचे, सौदर्याचे, प्रेमाचे मला भोवऱ्यामध्ये चिकटलेले पाश पूर्ण तुटलेत असंही नाही.

या वाटेवर चालू पाहणारी मी पहिली आहे असंही नाही आणि शेवटची तर मुळीच नाही. या विचारधारेचा भोवरा न होऊ देता प्रवाह वाहत ठेवायचा आहे एवढच.


महिला दिन विशेष प्रिय सखी,


 



 ऐकण्यासाठी  वरील YouTube link वर क्लिक करा.

8 मार्च 2021

 

महिलेस अनावृत्त पत्र,

 

प्रिय सखी,

 

निद्रेत असशील तर जागृत हो, जागी असशील तर धीट हो, अडकून पडली असशील तर मुक्त हो.. लक्षात घे आपल्या भीतीएवढी मोठी असते भिंत... पंख घेऊन उडणाऱ्याला भिंतीचं बंधन नसतं...

तुझ्यामागे बघ... खूप मागे लांब खोल गर्तेत एकीचा पदर अजून अडकलाय... तुझ्या पुढे बघ... खूप पुढे एक पदर धरण अडवून उभाय... वर बघ अंतराळात पदर सोडून सूट घालून तरंगतय कोणी...

आपण साऱ्याजणींनी  एक व्हायला पाहिजे.. पुरुषांच्या विरोधात नाही. बाईच्या बाजूनं.

तुझी आई, तुझी बॉस, तुझ्या घरची कामवाली, तुझी मैत्रीण, तुझी प्रोफेसर, तुझ्या बसची कंडक्टर, सेक्युरिटीवाली, तुला चहा आणून देणारी, तू जिला चहा नेऊन देतेस ती, तुझी मैत्रीण, तुझी ऑफिसातली सहकारी, तुझी शेजारीण, तुझी सासू, तुझी आजी... तुला माहिती आहे.. सगळ्या सोशिक आहेत. तुला माहिती आहे सगळ्या झगडतायत.. स्वतःशी, जगाशी.

या मालिका, हे सिनेमे, या जाहिराती आपल्या साऱ्याजणींमध्ये स्पर्धा लावतात. रंगाची, रुपाची, आदर्श मुलगी-सून-बायको होण्याची. हे पुरुषसत्ताक मानसिकतेतून आलेले जोक्स, गॉसिप आपल्याला एकमेकींवर जळायला शिकवतात. लक्षात ठेव या सगळ्या क्लुप्त्या आहेत. आपल्याला गुंतवून ठेवण्याच्या. आपण एक होण्याला घाबरते पुरुषसत्ता.

आपण माहेरच्यांची लाज आणि सासरच्यांची शान असतो म्हणे. घराण्याची इज्जत असतो म्हणे.  हे आपल्या विरुद्ध झालेलं सर्वात मोठं स्कँडल आहे लक्षात घे.

गोरा रंग, गुळगुळीत त्वचा, फिगर, केस यातच सौंदर्य असतं म्हणे. आणि बाईनं सुंदर आणि पुरुषानं कर्तबगार असावं म्हणे. ही आपली केली गेलेली सर्वात मोठी फसवणूक आहे लक्षात घे.

बाईला मुळातच घरकामात गती असते, तिच्यामध्ये मुळातच आईपण असतं, ती मुळातच सोशिक आणि सहनशील असते म्हणे. ही आपल्या बाबतची सर्वात मोठी अंधश्रध्दा पसरवली गेलेली आहे लक्षात घे.

तुझ्या विषयी Prejudices नको असं वाटत असेल तर privileges सोडून दे.  

पैशानं, कष्टानं, धीरानं जबाबदारी घे, हक्कानं अधिकार बजाव—मिळाले नाहीत तर झगडून मिळव.

आळस सोड. भाऊ बघेल, वडील बघून घेतील, नवरा सगळं सांभाळतो यातून बाहेर ये. मी करते म्हण. मी बघते मी सांभाळते म्हण. बरोबरीने उभी राहा.

कौतुक सुद्धा पारखून घे. तुझ्या दिसण्याचं, तुझ्या घरकामाचं, तुझ्या मुलगी म्हणून- बायको म्हणून समजूतदार असण्याचं, आई म्हणून एकहाती मुलांना सांभाळण्याचंच फक्त कौतुक होतंय का याकडे लक्ष ठेव. याहून वेगळे तुझे छंद, तुझं करिअर, तुझी अचिव्हमेंट यांचं जाहीर कौतुक होतंय का तेही बघ. ‘घरचं सांभाळून हवं ते कर’ ही सभ्य भाषेत दिली गेलेली धमकी आहे लक्षात घे. या शब्दात दडलेला खरा अर्थ, ‘घर सांभाळून नोकरी करता येत नसेल तर ती सोडून दे, आम्हाला तुझ्या नोकरीची गरज नाही’ असा आहे.

‘वेळ जात नाही’ असं म्हणतेस तेव्हा वेळ वाया जात असतो लक्षात घे.

तुझी सौंदर्याची व्याख्या तू बनव. तुझी आई बघ, मावशी बघ.. तुझ्या शाळेतल्या बाई आठव.. रंगात, फिगरमध्ये, कपड्यात ते नाही हे तुला एव्हाना कळायला हवं होतं. तुला कम्फर्टबल कपडे घाल, कुठेही कोणतेही कपडे घालून जा.. मोकळी हो.. आनंद शोध, हक्कानं रागव, मनातली प्रत्येक भावना ओळखून मोकळी कर.. बिनधास्त मोकळ्या मनाने जग.. बघ सुंदर दिसशील.

रंग, भाषा, कपडे, फिगर तुला बाह्य सौंदर्य देतीलही कदाचित. पण डोळ्यातला जीव तुझं तुला शोधावा लागेल. बघ एकदा आरशात डोळे निस्तेज होत चाललेत का तुझे? ते full ऑफ life व्हायला हवे असतील तर तुला जगावं लागेल. मनसोक्त जगावं लागेल.

वेळेत स्वयंपाक न झाल्याचा, घरच्या पसाऱ्याचा, घरच्या प्रथा-परंपरा पाळल्या न गेल्याचा गिल्ट घेणं बंद कर. घरातल्या सगळ्यांचा आनंद ही तुझी एकटीची जबाबदारी आहे हे जे बिंबवलं गेलंय ना आपल्या मनावर ते खरडून काढ. Adjustment चा ठेका घेऊ नको. समजूतदार व्हायचं म्हणजे सतत नमतं घ्यायचं असं नाही ना.

फक्त ‘असंच होत आलंय कित्येक वर्षं’ म्हणून एखादी गोष्ट स्वीकारू नको, ‘हळूहळू बदलतायत गोष्टी’ यावर विश्वास ठेऊ नको. गोष्टी आपोआप बदललेल्या नाहीयत. शेणामातीचे हल्ले पचवण्यापासून—नग्न धिंड काढून घेण्यापासून ते जीव गमावण्यापर्यंत .. सावित्री कालही लढत होती.. आजही लढत आहे. तुला लढता आलं नाही, रस्त्यावर उतरता आलं नाही, तर किमान तिच्या लढ्याची जाण ठेव, आचरणात आणशील तेव्हा आणशील पण किमान तिच्या विचारांचा प्रचार कर, प्रसार कर.. तुझा पाठींबा जाहीर कर.

‘हिच्या मागे मुलगा लागला’, ‘हिच्यावर बलात्कार झाला’ असं न म्हणता ‘हा मुलगा एका मुलीच्या मागे लागला’ , ‘याने एका मुलीवर बलात्कार केला’ असं म्हण. ‘सून सासू सासऱ्यांना बघत नाही’ असं न म्हणता ‘मुलगा त्याच्या आईवडिलांना बघत नाही असं म्हण. मुलीच्या आई वडिलांना सांभाळायला जावयानं नकार दिला तर आपण ‘जावई सासू सासऱ्यांना बघत नाही असं म्हणतो का?

नेमकी सणाच्या दिवशी पाळी आली याचा गिल्ट घेऊ नको, पोटात दुखून झोपून राहायला लागलं आणि घरची -ऑफिसची कामं झाली नाहीत याचा गिल्ट घेऊ नको. मासिक पाळी हा तुझा वौयक्तिक प्रश्न नाही तर अखंड मानव जातीची ती गरज आहे लक्षात घे.

सश्रद्ध असशील तर देवीला बाईच्या हातची पूजा चालत नाही याला विरोध कर, नास्तिक असशील तर आपल्या देवतांच्या- ऋषी मुनींच्या अनैतिक वागण्यावर बोट ठेव, प्रश्न विचार. स्त्रीला मोह ठरवणाऱ्या आणि पुरुषाला मोक्षाचा उपदेश करणाऱ्या अध्यात्मावर टीका कर.

तुला घरची लक्ष्मी म्हणून तुला बांधून ठेवतात, डोळे उघडून बघ. मूर्ती, कलश, कुंकू, मंगळसूत्र अशा प्रतीकांमध्ये अडकू नको. प्रेम शोध, आदर शोध.

कोणी कृष्ण येणार नाही तुझ्यासाठी. कृष्ण ही बाईच्या मनातली कविकल्पना आहे लक्षात घे.

प्रेमाची व्याख्या तपासून बघ. एकदा प्रेम करून कायमची अडकू नको. पुन्हा पुन्हा तुझ्या प्रेमाच्या कसोटीवर त्याला पारखून घे. तू सुद्धा पुन्हा पुन्हा प्रेमाची परीक्षा दे. एकदा बरोबरीचं नातं निर्माण झालं आणि एकदा दोघांचाही स्थितीत न अडकता प्रवास सुरु राहिला की परीक्षा परीक्षा राहत नाही. तेव्हा प्रेमात गणिताचं गाणं होताना तू पाहशील लक्षात घे.

सुखाची व्याख्या तपासून बघ. घर, गाडी, चांगल्या पगाराची नोकरी पुरते का बघून घे. साथ, सोबत, आदर, वेळ, किंमत, तुझ्या मताला जागा, तुझ्या स्वप्नांना वाटा, तुझ्या समाधानाला अग्रक्रम मिळतो का बघून घे. समाजात मिरवायला एकवेळ ते पुरेल पण जगायला गंमत येतीय का हे बघून घे.

नटणं, लाजणं, नखरे ही तुझी identity आहे असं थोतांड अनेक वर्ष चालू आहे. ते झुगारून दे. गढून काम करताना, मन लावून पुस्तक वाचताना, मळकट कपड्यांनी स्वच्छता करताना, घामेजून राबताना सुद्धा तू सुंदर दिसतेस, सेक्सी दिसतेस लक्षात घे.  Decline to be sleeping beauty.  तुला सरेंडर होण्याची गरज नाही. Be natural. तू पुढाकार घेऊ शकतेस, तू उग्र असू शकतेस, अग्रेसिव्ह असू शकतेस. आणि तेव्हाही सुंदर दिसतेस लक्षात ठेव. तेव्हाही हवीहवीशी वाटतेस लक्षात ठेव.

बाळावर संस्कार फक्त आई करत असते, ती तिची जबाबदारी आहे, मुलं मोठी होईपर्यंत तिने त्यांच्यासाठी घरी हजर राहिलं पाहिजे हे सगळं धादांत खोटं आहे. तुला घरी कोंडून घालण्यासाठी वापरलेला अंकुश. 9 महिने पोटात वाढवून जन्माला घालण्याची आणि अंगावर दुध पाजावण्याची  कृती सोडून मुलांना वाढवण्याच्या कामात असं एकही काम नाही जे बाळाचा बाबा करू शकत नाही. कामं वाटून घे.

लग्नासाठी करिअर सक्रिफ़ाइज करू नको. दोघं वेगवेगळ्या ठिकाणी असाल तर ज्याला सहज शक्य आहे त्याने दुसऱ्याच्या ठिकाणी काम शोधावं. बाई आणि पुरुष हा मुद्दा बाजूला ठेऊन दोघांमध्ये understanding  असावं. गरोदरपणात शक्य तेवढ्या शेवटपर्यंत काम कर. मुल जन्माला आल्यानंतर शक्य तितक्या लवकर परत काम सुरु कर. म्हणजे interview च्या वेळी विचारले जाणारे लग्नाचे आणि बाळाचे प्रश्न बंद होतील. प्रमोशनच्या मधले अडथळे दूर होतील.

जात, धर्म, देश सगळ्याच्या उच्च निचतेमध्ये बाईचा पहिला बळी जातो लक्षात घे. एक हो. समजून घे. पुरुषसत्ताक बंधनं नाकारताना जातीची, धर्माची, भाषेची, स्थानाची सगळी उच्च नीचता झुगारून दे. एक हो. समजून घे.  

आवाज उठवायला कुठलाही क्षण योग्यच असतो. स्वतःसाठी उभं राहण्याची वेळ कधीही निघून जात नाही. तुटलं तर तो तुझा दोष नाही. ते नातंचं तेवढं तकलादू होतं हा त्याचा निष्कर्ष.

इज्जत, अभिमान, लाज या भावनांना तिलांजली दिलेल्या बाईला पुरुषसत्ता सगळ्यात जास्त घाबरते लक्षात ठेव. तू बोलायला लागलीस की मूळ प्रश्नाला उत्तर न देता तुझ्या नैतिकतेला धरून वेगळेचं प्रश्न विचारले जातील. ‘मग तू यावर का नाही बोलत’, ‘मग तू त्यावर का नाही बोलत. डगमगू नको. त्यांच्याकडे उत्तर नसलं की ते प्रतिप्रश्न करतात. तू आदर्श नाहीस. असण्याची गरज नाही. आणि तरीही तू प्रश्न विचारू शकतेस. चुकलीस तर मान्य कर. क्षमा माग. स्वत: बदलायला कचरू नको. कुठलंही मत शेवटचं मत मानू नको. बदलायला तयार राहा. नवीन विचार स्वीकारायला तयार राहा. पण माणसाला समानतेकडे नेणारा प्रवास थांबवू नको.

एकदा ठरवलस की समानता मानायची की मग खरा प्रवास सुरु होईल. खोटं बोलणार नाही तुझ्याशी पण प्रवास अवघड आहे. प्रचंड दमवणारा आहे. पण तेव्हाच खूप समाधान देणारा आहे. आपल्या जिवंतपणी इच्छित स्थळी नाही पोचणार कदाचित आपण. पण तरीही हा प्रवास आयुष्याचं सार्थक करणारा आहे.

 - मृदगंधा 

स्वतःची प्रत्येक वेदना वसूल करायची सवय लागल्यामुळं .....


अन्य अनेक कलांपेक्षा ‘लेखन’ हे मला प्रीविलेज वाटतं. लिहिण्याइतका वेळ, साधनं माझ्याकडे आहेत आणि माझ्या लिखाणातून पैसे मिळवण्याची माझी इच्छा आणि गरज नाही. हे प्रिव्हिलेज आहे नाही का? स्वतःच्या छोट्या-मोठ्या भावनांवर लिहून झालं. मग दुसऱ्यांच्या प्रश्नांवर लिहून झालं. 

आयत्या मिळालेल्या प्रिव्हिलेजच्या गिल्ट मधून थोडं बाहेर पडता यावं म्हणून मी पुढारलेलं होण्याचा प्रयत्न करते, सर्वसमावेशक होण्याचा प्रयत्न करते, माझ्याकडून डीस्क्रीमिनेशन होणार नाही असा प्रयत्न करते. पण खोल आत मात्र माझ्यामध्ये एक जाणीव आहे जी कधी कधी माजात रुपांतरीत होते; माझ्याही नकळत. एक जाणीव की, मी बहुसंख्याक आहे, उच्चवर्णीय आहे, आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे, माझ्या बंडखोर वागण्याविषयी माझ्या कुटुंबाचा सपोर्ट आहे, माझ्यावर निखळ प्रेम करणारी माझ्यापाशी काही माणसं आहेत. मला जगावर रुसता येतं, अकारण मूड घालवून तासंतास तंद्री लावून आभाळाकडं बघत बसता येतं. माझ्या टॅनट्रम्सना महत्व देऊन माझी समजूत घालणारी, माझे लाड करणारी, माझं मन राखणारी माणसं माझ्याकडे आहेत. 

माझं काम देखील असं की जे न केल्यानं जगाचं काही अडणार नाही. माझ्या अस्तित्वाची गरज नाही. नसून खोळंबा नाही. आणि तरीही मी पक्की मतं घेऊन माजात जगतीय. कशासाठी आणि काय लिहावं तेच कळत नाहीय. कोणाशीच कनेक्ट होता येत नाहीय. देव, धर्म, परंपरा, प्रेम, कुटुंब, शिक्षण, करिअर सगळ्या सगळ्या गोष्टींच्या व्याख्यांचा, संकल्पनांचा आणि त्याच्या होत असलेल्या अंमलबजावणीचा मनात प्रचंड गोंधळ झालेला आहे. 

World is full of contradictions. सत्याचा शोध निष्फळ किंवा अनंत किंवा क्लेशदायक व्हायला लागलेला आहे. अनुत्तरीत प्रश्न घेऊन जगण्यापेक्षा प्रश्नाशिवाय जगलेलं बरं की काय असं वाटायला लागलंय. 

अन्यायात जगणाऱ्या माणसाला अन्यायाची जाणीव करून देणं इतकं कठीण का आहे? माणसाला सत्ता का हवी असते? प्रेम नैसर्गिक का नाही? सौंदर्य-पैसा या निकषांशिवाय आपण का एखाद्याला कुटुंबात-कामाच्या ठिकाणी सामावून घेऊ शकत नाही? आपण इतके भित्रे का असतो? ‘कधीही मृत्यू येऊ शकतो’ या अनिश्चिततेत आपण जन्मापासून असतो. मग आपण सुरक्षिततेच्या इतक्या मागे का असतो? देव सगळं बघतोय असं मानणारा माणूस भ्रष्टाचार कसा करतो? दया-क्षमा या तत्वांना देखील जाती धर्माचे- आर्थिक परिस्थितीचे- सामाजिक पोजिशनचे निकष कसे काय लागतात? आपण पैसेवाल्यांना महागड्या भेटवस्तू देतो आणि गरजूला मदत करत नाही असं का? जिवंत माणसाला द्यायला आपल्याकडे वेळ आणि पैसा नसतो आणि त्याच्या उत्तरक्रियेसाठी आपण कर्ज सुद्धा काढायला तयार असतो असं का? आपण स्वच्छता मिरवतो पण स्वच्छतेची कामं करायला आपल्याला लाज का वाटते? आपण स्वतःशी संवाद बंद का करतो? स्वतःच्या नजरेत पडूनही आपण डोळे झाकून कसे जगत राहू शकतो? 

माझ्या अनुरागात अट असते. प्रार्थनेत अर्चना असते. सज्जनतेत अपरिहार्यता असते. मदतीमध्ये स्वार्थ असतो. निखळ, निर्मळ, निष्फळ असं मी कधीही काहीही करत नाही. 

निरर्थकाशी ओळख व्हायला लागल्यापासून अर्थाशी फारकत झालेली आहे. म्हणून लिहावसं वाटत नाही. 

पण स्वतःची प्रत्येक वेदना वसूल करायची सवय लागल्यामुळं हेही लिहूनच काढलं.

हा लेख मी फक्त स्त्रियांच्या वतीने लिहिलेला नाही.


याआधीचे स्त्री-पुरुष समानतेविषयीचे काही लिखाण वाचण्यासाठी या लिंक देत आहे. 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3167922473289262&id=100002146226513&scmts=scwspsdd&extid=V9K7YuIvF6dogDbq








स्त्री-पुरुष समानातेविषयी माझ्यासारखे लोक बोलतात तेव्हा काही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात,

1.    स्त्री- पुरुष समानतेविषयी बोलताना सगळ्या स्त्रिया माझ्या बाजूच्या असतीलच असं नाही.

2.    स्त्री-पुरुष समानतेच्या थेट/वळणावळणाने विरोधात बोलणाऱ्या स्त्रिया स्वतः पुरुषसत्ताक पद्धतीच्या बळी आहेत. त्यामुळं त्यांच्याशी लढावं लागलं तरी लढताना दृष्टीकोन सहानुभूतीचा ठेवावा लागेल.

3.    तत्व म्हणून स्त्री-पुरुष समानता स्वीकारली म्हणजे लगेच उद्यापासून जग बदलेल असं होणार नाही. तो प्रवास दोघांनी मिळून करावा लागेल.

मुळात तत्व म्हणून स्त्री पुरुष समानता मानताना देखील लोक अटी घालतात. स्त्रीने सशक्त व्हायला पाहिजे म्हणे त्यासाठी. इथे दोन मुद्दे आहेत, पहिले म्हणजे प्रचंड वेदना सहन करून एका स्त्रीनेच तुम्हाला जन्माला घातलेलं आहे. त्यामुळे शारीरिक दृष्ट्या तर ती सशक्त आहेच. बाकी राहिला प्रश्न शिक्षण, नोकरी याचा. स्त्रीनेच काय प्रत्येकाने शिक्षण घ्यावं आणि आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहावं हेच योग्य आहे- मग ती स्त्री, पुरुष कोणी असो. पण थोडा विचार केला तर लक्षात येईल की आत्ताचे पुरुष वर्चस्व पुरुषाच्या सशक्त असणाऱ्यावर अवलंबून नाही. भित्रा, कमी शिकलेला, न कमावणारा असा एखादा मुलगा आईवर, बायकोवर सत्ता गाजवताना तुम्ही आजूबाजूला पाहिलेला नाही? घरची आर्थिक जबाबदारी घेतात म्हणून सत्ता गाजवतात म्हणावं तर बायकोपेक्षा खूप कमी पैसे मिळवणारे आणि तरी बायकोशी माजात वागणारे कितीतरी नवरे मला माहिती आहेत.

"आपल्याकडे पुरुषसत्ताक पद्धती आहे. स्त्री-पुरुष समानता येणं आवश्यक आहे. त्यासाठी स्त्रीला झगडावं लागणार आहे. आणि या सगळ्या प्रवासात मी स्त्री असो की पुरुष असो एक माणूस म्हणून मी समानतेच्या बाजूने आहे" हे आपण सतत घोकलं पाहिजे.

एक स्त्री म्हणून विचार केला तर अनेक आघाड्यावर लढावं लागणार आहे,

1.    स्वतःच्या looks, appearance, dressing याला आपल्या अस्तित्वाचा निकष न होऊ देणे.

2.    आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहणे.

3.    घरी, कॉलेजात, ऑफिसमध्ये, संसारात पुरुषांच्या बरोबरीने काम करणे, आणि महत्वाचं म्हणजे जबाबदारी घेणे.

4.    कष्टाची कामे पुरुषाने करावीत अशी अपेक्षा न करता स्वतःला कष्टाच्या कामांसाठी तयार करणे.

5.    मुलाने प्रपोज केलं पाहिजे, त्यानंच गिफ्ट दिलं पाहिजेत, मुलानंच ड्रायव्हिंग केलं पाहिजे, त्यानंच खर्च केला पाहिजे असे समज डोक्यातून काढून टाकणे.

6.    स्वतःच्या शिक्षणाचा, करिअरचा, कपडे-दागिने, शाकाहारी-मांसाहारी खाण्याचा  निर्णय स्वत: स्वतःसाठी ठामपणे घेतला पाहिजे.

7.    भाऊ, नवरा दोघांच्या बरोबरीने दोन्ही घरी आर्थिक व्यवहारात, सर्व प्रकारच्या निर्णयात आणि जबाबदारीत बरोबरीने सहभागी झालं पाहिजे.

8.    अंधश्रध्दाना बळी नाही पडलं पाहिजे.

9.    सतत स्वतःला प्रश्न विचारत, माणूस म्हणून स्वतःवर काम करत राहिलं पाहिजे. बदलांना स्वीकारलं पाहिजे नव्हे प्रसंगी बदल घडवले पाहिजेत.  

10.बरोबरीचा अधिकार उपभोगताना बरोबरीने जबाबदारी घेतली पाहिजे.

थोडक्यात काय तर स्त्री म्हणून आपल्याविषयी prejudices नकोत असं वाटत असेल तर previleges सोडावी लागतील.

उगाच लग्नात प्रोब्लेम येईल, उगाच घरचे दुखावतील, सणा-वाराला तमाशा नको, एवढीशी तर गोष्ट आहे, तो कमावतोय ना भरपूर, काही कमी पडत नाहीय ना, बाकी मुलींचे नवरे-सासरचे लोक किती छळतात त्यांना, त्यापेक्षा आपलं बरं आहे ना, मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला ही वाक्य कायमसाठी मराठी भाषेतून काढून टाकली पाहिजेत.

अस विचार करणाऱ्या स्त्रियांना मला सांगावसं वाटतं,

बाई गं तुझ्या लग्नात alrady प्रोब्लेम आहे. फक्त तू denial mode ला गेली आहेस इतकंच.

घरचे दुखावतील म्हणून तू शांत राहतेस. पण दुखावली जात आहेसच ना. आणि तू समजुतीने घेतेस म्हणून ते तुझं कौतुक करतायत का? आणि त्यांच्या मनासारखं वागून देखील हसऱ्या चेहऱ्याने वावरतायत का? माझ्या आईच्या भाषेत कितीही बाबापुता केलं तरी यांची तोंडं हगायला गेलेली. मग कशाला त्यांच्या दुखण्याचा एवढा विचार करतीयस?

सणा वाराला तमाशा नको असं त्यांना पण वाटत असेल तर तू बोललीस की तुझ्या मनासारखं करून गप बसतील ते. सणवार चांगले जाणं ही तुझ्या एकटीची जबाबदारी आहे का? आणि असेल तर का याचा कधी विचार केला आहेस?

एवढीशी गोष्ट आहे. असं तू म्हणतेस. तुझी एवढीशी गोष्ट तितक्याच समजुतीने ते सोडून देतात?

तिच्यापेक्षा माझं बरं. मग तू काय आता तुझ्यावर हात उचलायची वाट बघती आहेस काय? फक्त 'मारहाणीलाच' छळ म्हणता येता का?

मग आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय. या वाक्याचा तर अर्थच मला कळलेला नाही. ते तुला बरोबरीने वागवत नाहीत इथेच त्यांनी त्यांच्यात आणि तुझ्यात फरक केलेला आहे. आता वेगळ्यानं तुला फरक दाखवत बसायची काय गरज आहे?

पुरुषसत्ताक संस्कृतीत वाढलेल्या पुरुषासाठी देखील अशा समानतेने जगणाऱ्या स्त्री सोबत वावरणं थोडं अवघड जाणं स्वाभाविक आहे. पण 'समानता हवी' हे तत्वं म्हणून एकदा पुरुषांनी स्वीकारलं की तेव्हाचं साहचर्य आत्तापेक्षा कितीतरी प्रगल्भ असेल अशी मला खात्री वाटते. एका दिवसात अमुलाग्र बदल होणार नाही, हे तर आहेच. फक्त तो अपोआप होणार नाही. तो आपल्या आपल्या कुवतीप्रमाणं आपल्याला घडवावा लागेल.  

डॉ दाभोलकर वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या बाबतीत म्हणायचे तेच तत्व आपण वळवून स्त्री-पुरुष समानतेसाठी उपयोगात आणलं तर?

पहिली पायरी म्हणजे स्त्री-पुरुष समानता हा विचार म्हणून स्वीकारणं.

दुसरं म्हणजे स्त्री-पुरुष समानतेचा प्रचार करणं.

आणि तिसरं म्हणजे स्त्री-पुरुष समानता आचरणात आणणं.

यात सगळे मुद्दे आले असतील असं नाही. त्यामुळे वाचणाऱ्यांनी नक्की त्यांचे इनपुट्स द्यावेत. फक्त चुका काढण्यासाठी जेव्हा अशा लिखाणावर लोक बोट ठेवतात तेव्हा नाराज व्हायला होतं. स्त्री-पुरुष समानता तुम्ही मान्य करत असाल तर तुमचा टोन positive असावा असं मला वाटतं. विचारात, आचारात काय सुधारणा करायची ती आपण करू, चर्चा करू. पण आपण एका बाजूचं असावं आणि आपलं ध्येय समानता असावं एवढं मला वाटतं. उगाच ओळखीच्या एखाद्या स्त्रीचं उदाहरण देऊन गोष्टी जनरलाईज करू नयेत.

हा लेख मी फक्त स्त्रियांच्या वतीने लिहिलेला नाही. स्त्री-पुरुष समानता मानणाऱ्या सर्व स्त्री-पुरुषांच्या बाजूने पुरुषसत्ताक पद्धतीला टिकवणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या विरोधात लिहिलेला आहे. वाचणाऱ्या व्यक्तीने ठरवावं की ती कोणत्या बाजूची आहे.


यातून माझा अभिमान प्रगल्भ होईल. आंधळा होणार नाही.....

 


'अभिमान' म्हणजे काय?

अभिमानामध्ये काय काय समाविष्ट होतं?

मला जे आयतं, माझ्या प्रयत्नांशिवाय लाभलं त्याचा मनापसून स्वीकार. म्हणजे माझे आई बाबा, नातेवाईक, घराणं, माझं नाव, आडनाव, जात, धर्म, गाव, भाषा, देश.  

मी जे कमावलं त्याची जाणीव. म्हणजे माझे निर्णय, कष्ट, सातत्य, सन्मार्ग, यश, माझ्यातल्या करुणा-प्रीती-क्षमा अशा मूळ तत्वांना ओळख देऊन त्यांचा जाणूनबुजून वाढवलेला पसारा, माझ्यातल्या animal instinct वर काम करत माझ्यातला मी घडवलेला माणूस.

बरं पुन्हा 'स्वीकारायचं' म्हणजे काय?

त्याची ओळख करून घ्यायची, माहिती घ्यायची, इतिहास समजून घ्यायचा, प्रत्येक गोष्टीचे कंगोरे-खोली-लांबी-रुंदी समजून घ्यायची. साहजिकच या प्रवासात चांगल्या-वाईट दोन्ही गोष्टी समजतील. काळानुरूप मूळ चांगल्या पण आता वाईट ठरणाऱ्या गोष्टी सापडतील. माझ्या नातेवाईकांच्या हातून गुन्हा झाला, माझ्या धर्मातल्या अमानवी गोष्टी मला समजल्या, माझ्या गावाच्या – देशाच्या मर्यादा लक्षात यायला लागल्या. तरी जन्मानं मला मिळालेल्या गोष्टींचा अभिमान बाळगायचा, त्यांना स्वीकारायचं म्हणजे त्यांना defend करायचं? की खुल्या मनानं ते मान्य करून उपाय शोधायचा?

माझी बहिण व्यासनांध झाली तर तिचा मार्ग चुकतो आहे हे स्वीकारून तिला त्यातून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करेन ना मी? आणि ते मार्ग दारू-सिगारेट विकणाऱ्या लोकांना दोष देत बसणारे नसतील तर माणूस म्हणून तिला व्यसनातून परावृत्त करणारे असतील. हाच न्याय माझी भाषा, जात, धर्म, गाव, देश यांच्या बाबतीत लागू होईल ना?

अभिमान बाळगायचा म्हणजे criticism ऐकायचं नाही असं तर नव्हे ना?

चुकीच्या, काळाआड गेलेल्या गोष्टीना defend करत रहायचं असं तर नव्हे ना?

उदाहरण म्हणून ... सीतेची सत्वपरीक्षा त्या काळात त्या समाजात योग्यही असेल. आज तिला आपण चूक म्हणलं पाहिजे, परशुरामानं वडिलांच्या सांगण्यावरून आईला मारून टाकणं तेव्हा पितृभक्ति असेल- आज आपण त्याला चूक म्हणलं पाहिजे.. अशा अनेक नव्या-जुन्या गोष्टींची यादी करता येईल. ज्या गोष्टी महत प्रयासानं माणूस म्हणून आपण बदललेल्या आहेत.. आपली उत्क्रांती थांबलेली नाही.

माझ्या भावानं एखाद्या स्त्रीला फसवलं तर भाऊ चुकला असं मी म्हणलं पाहिजे- भावावरचं आंधळं प्रेम सोडून मी त्या स्त्रीची बाजू घेतली पाहिजे, माझ्या धर्मातल्या उच्च-नीचता मानणाऱ्या-वाढवणाऱ्या गोष्टी त्यागून मी माझे जात-धर्म अपग्रेड केले पाहिजेत  ना? माझ्या आणि माझ्या गोष्टींच्या कमजोरी, मर्यादा मी मान्य केल्या पाहिजेत. आणि त्या दूर होण्यासाठी किमान माझ्या वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करत राहायला पाहिजे. याला खऱ्या अर्थाने 'स्विकारणं' असं म्हणता येईल.

आणि यातून माझा अभिमान प्रगल्भ होईल. आंधळा होणार नाही.  

अहिंसा, पर्यावरणाचं संवर्धन, समता, स्वातंत्र्य, लोकशाही अशी काही तत्वं हजारो वर्षांच्या मानवी इतिहासातून आपण शिकलो आहोत. ही तत्वं पुन्हा पुन्हा सिद्ध झालेली आहेत. अभिमानाची चुकीची व्याख्या आपल्या माणूस म्हणून कमावलेल्या शहाणपणाच्या आड येता कामा नये.

नातं रुजावं खोल..सांभाळावं लागू नये..


 

प्रेमावर आपण भरपूर बोलतो, भरपूर लिहितो. पण सॉक्रेटीसच्या खोडीप्रमाणं प्रेमाची व्याख्या करायला जात नाही.

एखाद्या माणसाचा सहवास हवासा वाटणं म्हणजे प्रेम?

एखादा माणूस पटणं म्हणजे प्रेम?

एखाद्या माणसावर हक्क वाटण्याइतपत तारा जुळणं म्हणजे प्रेम?

एखाद्या माणसाच्या आपलं असण्यानं सुरक्षित वाटणं म्हणजे प्रेम?

मानसिक, शारीरिक, सामाजिक संकोच ज्या माणसासमोर राहत नाही ते प्रेम?

सामाजिक अनुरूपता म्हणजे प्रेम?

की वैचारिक भारलेपण म्हणजे प्रेम?

शारिरीक आकर्षण हे प्रेमाचं श्रेय असतं का खरंच?

एखाद्याकडून शून्य अपेक्षा आणि लाखभर सदिच्छा म्हणजे प्रेम?

की न ठरवता, न मोजता, विश्लेषण न करता ऋतूत झाड मोहरून यावं तसं दोघांनी एकमेकांच्या आयुष्यात मिसळून जाणं म्हणजे प्रेम?

वेळ, वय, ऊन- पाऊस, माती, बीज... कुणाचं श्रेय नाही यात?

एखादा माणूस उलगडत जाईल तसा पटत जायला हवा.

'सोबत' घडणं आणि 'सोबत' निभावणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.  

प्रवाह मिसळतात आणि रेल्वेचे रूळ? एकत्र पण, समांतर....

तुझा-माझा प्रवाह झाला पाहिजे,........

आपसूक, अलगद, नकळत....

बस् एवढी एकच अट आहे, की, सहवास घडावा..निभावावा लागू नये.

नातं रुजावं खोल..सांभाळावं लागू नये..

आपलं अद्वैत असावं- समांतर चालावं लागू नये..

बस् एवढी एकच अट आहे...की,

तुझा-माझा प्रवाह झाला पाहिजे,........

आपसूक, अलगद, नकळत....

 

 

परवडत नसेल तर तसं मान्य करा नाहीतर धंदा गुंडाळून गप्प बसा..


 

यावर्षीच्या दिवाळी अंकांच्या जाहिराती बघून मला आठवण झाली. मागच्या वर्षी एका दिवाळी अंकाने माझ्याकडून कथा मागवून घेतली होती आणि दुसऱ्या एका दिवाळी अंकासाठी मी एक अनुवाद करून दिलेला होता. आजतागायत मला त्याचे पैसे मिळालेले नाहीत. पहिल्या सहा महिन्यामध्ये मी पाठपुरावा केला. त्यांनीही पैसे देण्याचं पुन्हा पुन्हा कबूल केलं. पण पैसे दिले नाहीत. दुसऱ्याच्या कष्टाचं खाऊन यांना झोप कशी लागते याचं मला आश्चर्य वाटतं.

पैशांचे वांदे झाले असतील तर तसं स्पष्ट सांगून त्यांनी हा दिवाळी अंकाचा उपद्व्याप बंद करायला हवा होता. पण असे अनेक फुकटे लोक दरवर्षी माझ्यासारखा नवीन बकरा शोधतात आणि आपले दिवाळी अंक भरतात. छापून येण्यात लेखनाची इतिकर्तव्यता मानणारे लोक 'जाऊ दे' म्हणून सोडून देतात.

लेखकाची प्रतिमा, फोफावलेले लेखक-कवी, हौशी आणि व्यावसायिक लेखक अशा अनेक विषयांवर वेगळ्याने विस्तृत बोलायला हवं.

पण इथे मुद्दा अगदी सरळ कष्टाच्या आणि हक्काच्या पैशाचा आहे. मग तो लेखक असो नाहीतर हमाल. योग्य, पुरेसा मोबदला मिळायलाच हवा.

ठराविक मुदतीत आपले पैसे मिळाले नाहीत की बोभाटा करून ही गोष्ट सांगितली पाहिजे सगळ्यांना. हजार दोन हजारसाठी काही आपण कोर्टात जाणार नसतो म्हणून यांचं फावतं.

आणि निर्लाज्जासारखी पुढच्या वर्षी हे लोक आपल्यला दिवाळी अंकाची जाहिरात पाठवतात. परवडत नसेल तर मान्य करा, स्पष्ट कल्पना द्या, सांगा आणि धंदा गुंडाळून गप्प बसा. फसवू नका. फक्त लेखकच नव्हेत; वेगवेगळ्या ठिकाणी असे एकएकटे काम करणारे लोक असतात. त्यांच्या अशा छोट्या मोठ्या रकमा बुडवल्या जातात. राजरोसपणे बुडवणाऱ्यांचे धंदे चालू राहतात. आपल्या कौशल्याचा, कष्टाचा मान राखला जात नाही. आणि आपण काय करू शकतो?

पुढच्या वेळी पैशांचं स्पष्ट बोलल्याशिवाय काम घ्यायचं नाही हा धडा. ठीकाय मला हा धडा मिळाला. पण यंदा त्यांनी अशी दुसरी नवी मृदगंधा शोधली असणार. दुनियादारीच्या एका धड्यासाठी ती यावर्षी फुकट काम करून देणार.

याला काही उपाय नाही?