तो गुंड आहे, माहिती आहे



तो गुंड आहे, माहिती आहे. त्याचे डोळेच सांगतात की तो क्रूर, कोल्ड ब्लडेड आहे. अनेक गुन्ह्यांचा तो कर्ताधर्ता आहे. पण कोर्टात काही सिद्ध होणार नाही हेही तितकंच खरं आहे. पण तरी सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती असतंच. गावात त्याची चौथाई आहे. पूर्वी तो लपून छपून गोष्टी करायचा. आता तो खिशात कायदा घेऊन फिरतो.

पण आम्ही विरोध करत नाही, डोळेझाक करतो.. का माहिती आहे? कारण तो माणूस आमच्या बाजूचा आहे. उद्या टोकाची परिस्थिती निर्माण झाली ना तरी तो आम्हाला काही करणार नाही. आम्ही त्याच्या नात्यातले आहोत ना. 

पूर्वी आपण गुंडांविरुद्ध उभे राहिलो. चांगलं केलं. पण आता गरज नाही. कारण हा गुंड आपल्या बाजूचा आहे. म्हणून आपण याचे बाजूचे झालो. चांगलं केलं. 

असा माणूस असू नये हे खरं, पण तो जर आपल्या बाजूचा असेल तर त्याच्यासारखं सुख नाही. तो असला म्हणजे आपण अनवेअर-इग्नोरंट राहायला मोकळे. त्याच्या जीवावर माज करायला मोकळे. 

 

माझं जग फोन एवढं.


जगाएवढं मोठं जग होतं माझं, मी लहान असताना

अख्ख गाव माझं घर होतं, मुळात घर लहान असताना...


हळूहळू कळत गेली तहान भूक मोह माया

शेवटाच्या प्रारंभी निव्वळ काया...


माझं घर, माझी माणसं, माझं काम, माझा पैसा

माझ्या माझ्या जगामधला माझा माझा पसारा...


पाऊस माझा पाहुणा होता, वारा वात्रट सवंगडी

वाटा सगळ्या अनोळखी; तरी सहज सुटत चालण्याची कोडी...


माणसांचे दोनच प्रकार होते-अनोळखी नि ओळखीचे

अविश्वासाचा वेढा पडण्याआधी,अबाधित होते राज्य विश्वासाचे...


जग कळत नव्हतं तोवर अख्ख जग माझं होतं

कळत गेलं तसं सारं, माझं मी मोजून घेतलं...


लहान लहान होत होत माझं घर चारच खोल्यांचं झालं

तिथूनही कळेना कधी माझ्या एवढुश्या खोलीत जाऊन सामावलं...


एवढ्याशा फोन मधून जग समजताना माझं जग फोन एवढं,

छोटं छोटं होत होत छोटं छोटं होत गेलं.....


मला काय %@&^% फरक पडत नाही.

 


आमच्या 9वी ‘अ’ चा पट साधारण 72-74 असा काहीतरी होता. त्यातल्या एकूण 20 जणींची नावं सुद्धा मला आता सांगता येणार नाहीत; किंबहुना तेव्हा देखील सांगता आली नसती. आमचा आमचा असा 7-8 जणींचा ग्रुप होता.

पहिली ते पाचवी या इय्यतांसाठी फ्रॉकसारखा गणवेश आणि सहावी ते दहावीसाठी चुडीदारसारखा गणवेश होता. आम्ही नववीत गेलो आणि चौकड्याचा चुडीदार बदलून शाळेने प्लेन चुडीदार केला. नोटीस लागली. मी घरी सांगितलं. आई म्हणाली, ‘ठीक आहे. रविवारी जाऊन नवीन गणवेश घेऊन येऊ.’ दुसऱ्या दिवशी सारिकाचे वडील वर्गशिक्षकांना भेटायला आले.

"अहो आता कुठून आणायचा नवीन ड्रेस? माझ्या मोठ्या पोरगीचा ड्रेस सारिका घालती. हे वर्ष तो गेला असता. आता तुम्ही म्हणता तो राहूदे नवीन घ्या. कशाला? काय वाईटाय आधीच्या ड्रेसमध्ये? का बदलताय?"

"संस्थेचा निर्णय आहे.." आमच्या बाई याहून अधिक काहीच बोलल्या नाहीत.

सारिकासारख्या मुली प्रत्येक वर्गात होत्या. कोणाचा बाप म्हणाला, ‘सोडून दे शाळा’, कोणाचा म्हणाला, ‘घेणार  नाही म्हणून सांग नवीन ड्रेस’, कोणी म्हणलं, ‘पुढच्या महिन्यात घेऊया माझी अंबाबाई’..

सारिका आमच्यात आली. आम्हाला म्हणाली, "आपण सगळ्यांनी मिळून सांगितलं तर ते निर्णय बदलतील. आपण सगळ्या मिळून पत्र देऊ. सहावीत नवीन येणाऱ्या मुलींपासून नवा गणवेश करा म्हणू. आमचा जुन्या मुलींचा दहावीपर्यंत हाच राहू दे. चला आपण मिळून जाऊ बाईंकडं"

आम्हाला तिचं म्हणणं पटलं. पण मिळून जायला आम्ही नकार दिला.

"का गं?" ती म्हणाली.

"कारण नवीन गणवेश आला तरी मला फरक पडत नाही.."

तिनं मग मला पुढं काही विचारलं नाही. शाळेने काही गरीब मुलींना नवीन गणवेशाचं वाटप केलं. त्यात सारिकाला देखील गणवेश मिळाला. मला बरं वाटलं. तो तिला अपरा व्हायचा. गुडघ्याच्या वर बसायचा. सारिका उंच होती ना. पण हळूहळू त्याची सवय झाली.

नववीचं बीजगणित-भूमिती अवघड होतं. त्यात आमचे गणिताचे मास्तर. वर्गात यायचे. गणित फळ्यावर लिहायचे. आणि सरळ गणित सोडवायला घ्यायचे. ‘वहीत उतरवून घ्या’ असं आम्हाला म्हणायचे आणि तासाची घंटा झाली की निघून जायचे. काहीच समजायचं नाही आम्हाला.

मी घरी सांगितलं. बाबांनी मला गणितासाठी शिकवणी लावली. बाबांचं गणित चांगलं आहे माझ्या. त्यामुळं ते पण उजळणी घ्यायचे.

दिपाली मला म्हणाली, "आपण आपल्या वर्गशिक्षकांना सांगूया. काय समजत नाही आम्हाला म्हणून. ते काय शिकवतच नाहीत तर काय समजणाराय?"

मी नकार दिला.

मला तिचं म्हणणं पटलं होतं. पण मिळून वर्गशिक्षकांकडे जायला मी नकार दिला.

"का गं?" ती म्हणाली.

"मला गणिताची शिकवणी आहे ना. शाळेत काही शिकवलं नाही तरी मला फरक पडत नाही.."

दिपाली कोणाकोणला शंका विचारायची, पुन्हा पुन्हा उजळणी करायची, चक्कं उत्तराच्या पायऱ्या पाठ करायची. ती धडपडत शिकत राहिली.

आंतरशालेय एकांकिका स्पर्धा होत्या. अचानक विज्ञानाच्या तासाला संगीताच्या बाई वर्गात आल्या. त्यांनी आमच्या 7-8 जणींची नावं घेतली. माझे उच्चार चांगले होते, सानिका पेटी वाजवायची, कोमल नाचायची छान, पूजा दिसायला सुंदर होती, शलाका आणि अक्षताचा अभिनय चांगला होता. विज्ञानाचा तास चुकवून जायला मिळालं म्हणून मी खुश झाले. ‘संगीत सौभद्र’ चा काही भाग बाई बसवणार होत्या. मी कृष्णाच्या प्रेमात पुन्हा पुन्हा नाटक वाचून तोंडपाठ केलं. मयुरीला बाईनी बोलावलं नव्हतं. ती मला म्हणाली,

"मला संबळ चांगली वाजवता येती. तू ऐकलीयस की. बाईना सांग की”

अगं पण सौभद्रात कशाला हवी संबळ”

मग वेगळं नाटक बसवायला सांगू की. एक वर्ष आड हेच एकच नाटक बसवतात.  आणि संबळ राहू दे. पण त्यांना ऑडीशन घ्यायला सांगू यार. दरवर्षी तुम्हीच नाटक करणार काय. आणि तेच तेच नाटक सारखं. याला काय अर्थय?"

पण मला कृष्ण आवडतो अगं”

कृष्ण आवडतो ना, मग कृष्णाचंच वेगळ कायतर नाटक करूया की. गोपाळकाल्याचं करूया. ती 9 वी ‘फ’ मधली सुरेखाय ना ती पावा भारी वाजवती. तिला घेऊ. नाहीतर अजून कोणाला येत असेल तर बघू. बाकी सगळे बाळगोपाळ. सगळ्यांचं जेवण एकत्र करायचं- झाला काला. ऑडीशन घ्यायला सांगू की गं. वेगळं नाटक करूया की गं”

मला सौभद्र मधली गाणी आवडत असत. आजही आवडतात. बाईंनी मला नाटकात घेतलं होतं. त्यामुळं मला फरक पडत नव्हता. मी मयुरीसोबत गेले नाही.

माझ्याच वर्गातल्या एका मुलीनं नववीत असताना बाईंच्या रागावण्याला घाबरून वर्गात शु केली. त्यानंतर दहावी होईपर्यंत ती शेवटच्या बाकावर एकटी बसायची. एकटी डबा खायची. मधल्या सुट्टीत एकटीच वहीत रेघोट्या मारत बाकावर बसून असायची. तिची आई मला म्हणाली, ‘तिला तुमच्यात खेळायला घेत जा’. मी फार पुढाकार घेतला नाही. मी तिला घेऊया म्हणलं तर मला सुद्धा माझ्या मैत्रिणी सोडून देतील आणि आपण सुद्धा तिच्यासारखे एकटे पडू या भीतीनं मी तिला टाळत राहिले.

वर्षाचं दहावीत असताना लग्न झालं. आम्ही बारावीत गेलो तोपर्यंत तिला एक मुलगा झालेला. ‘अव्वा... तिला बाळ पण झालं!!!’ असं म्हणून मी तोंडावर हात ठेवला.

प्रज्ञाचं 11वी तल्या एका मुलाशी लफडं होतं. अशा वाया गेलेल्या मुलीशी आम्ही बोलायचो नाही. प्रेमात पडून लफडी करणाऱ्या मुलींच्या नादाला लागायचं नाही हे आम्हाला पक्कं ठाऊक होतं. त्यामुळं शाळेत ती एकटी एकटीचं असायची. एखाद्या घाणेरड्या वस्तूकडे पाहावं तसं आम्ही तिच्याकडे पाहत होतो.

"काल शाळेतनं परत जाताना साने गल्लीत एका मुलांनं मला अडवलं. माझा हात धरला. मला खूप भीती वाटतीय. घरी सांगितलं तर पप्पा मला मारतील. सर तुम्हीच काहीतरी करा ना"- संगीता म्हणाली.

सरांनी त्याच गल्लीत राहणाऱ्या शाळेतल्या 3-4 मुलींशी तिची ओळख करून दिली. थोडे दिवस सगळ्याजणी एकत्र जात जावा म्हणून सांगितलं.

एका मवाल्यानं हात धरलेली मुलगी. आम्ही तिच्यापासून चार हात लांबच राहत होतो. तिच्याकडे पाहिलं की काहीतरी अस्वच्छ, घाणेरडी फिलिंग यायची.

स्वरूपा आमच्या ग्रुपमध्ये होती. पण तिच्या घरी जेवायला मात्र ती फक्त मला बोलवायची. आम्ही दोघी जातवाल्या होतो ना. पायल मला म्हणाली, ‘ तू तिला जेवायला येणार नाही म्हणून सांग. बोलावलं तर सगळ्यांना बोलवायला पाहिजे’

मला सगळ्यांच्या घरी जेवायला बोलवत. काही घरात तर जेवणानंतर मला अकरा रुपये, एकवीस रुपये सुद्धा मिळायचे. मी पायलचं बोलणं मनावर घेतलं नाही. मला फरक पडत नव्हता.

आजही पडत नाही. बहुतांश गोष्टी या माझ्यासाठी बातम्या असतात फक्त. निव्वळ एक चर्चेला विषय. मागच्या जन्मीचं पुण्य म्हणून मी या कुळात जन्माला आले. नाव, गाव, आडनाव, आई-वडील... सगळं कसं यथासांग.

इतकं सगळं असूनही मनात कायमची एक भीती आहे. संशयशंकाअविश्वासअसुरक्षितता मनात भरून राहिलेली आहे. असं वाटतं की एखाद दिवस हे सगळं नष्ट झालं तरअचानक हा बँक बॅलन्स- ही इज्जतही सहज मिळणारी संधी- हे सगळे प्रीविलेजेस एकदम नाहीसे झाले तरयांच्याशिवाय मला काय अस्तित्व आहे?!  मग मी पोथ्या वाचतेजप-जाप्य करते. असाच कशाचाही काहीही फरक न पडता मला जगता यावं म्हणून मी देवाची आराधना करतेपत्रिका बघतेहोम हवन करते. ‘हे असंच असतं. मी पूर्व पुण्याईने हे मिळवलेलं आहे’ यावर इतरांचाही विश्वास बसावाश्रद्धा जडावी असं मला वाटतं, कारण तरच माझं स्वार्थीपणाचं हे सगळं जगणं यथासांग सुरळीत चालणार आहे.

‘मी कोणाच्या अध्यात-मध्यात नाही’ हे नक्की अभिमानाने सांगण्याचं वाक्य आहे की खालमानेने सांगण्याचं असा प्रश्न मला पडायला लागलेला आहे. ‘कोणाच्या अध्यात-मध्यात न पडता’ जगण्याची चैन मला परवडते. अराजकीय-अनअवेअर-इग्नोरंट राहण्याची चैन मला परवडते.

ज्या माझ्या नाकर्तेपणाची मला लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट मिरवायला शिकवणारी ही संस्कृतीहा इतिहासही कलाही सामाजिक-आर्थिक व्यवस्था युगानुयुगे टिकावी.!!!

 


सोशल डायलेमा आणि आई-बाबा ...

 


मी पहिलीत असेन. ताई पाचवीला होती. शाळा सुटली की रोज संध्याकाळी आम्ही गल्लीत खेळत असू. सात वाजता आजी गल्लीतल्या सगळ्या पोरासोरांना गोळा करून शुभंकरोती, मनाचे श्लोक, रामरक्षा, पसायदान म्हणवून घ्यायची. गोष्टी सांगायची. मग आईचा स्वैपाक होईपर्यंत बाबा माझ्याबरोबर खेळायचे किंवा माझं मन रमेल असं बघायचे. दर गुरुवारी आई-बाबा आम्हाला नदीच्या घाटावर फिरायला घेऊन जायचे. अधून मधून इंजुबाई देवीच्या आवारात भूतकांडी खेळायला आम्ही जात असू. अख्खा रविवार अभ्यासाला सुट्टी असायची. पूर्ण वेळ खेळायचं. आई माझ्याबरोबर जिबलीनं खेळायची, बिट्ट्या खेळायची. अगदी आम्ही बहिणी नोकरीला लागल्यानंतर सुद्धा स्क्रॅबल, पत्ते, बॅडमिन्टन, कॅरम असा खेळांचा शिरस्ता चालूच राहिला.

काल सोशल डायलेमा ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर पाहिली. ऑनलाईन माध्यमे बनवण्यामध्ये सहभागी असणाऱ्या तंत्रज्ञांनीच त्या ऑनलाईन माध्यमांचे दुष्परिणाम त्यामध्ये सांगितले आहेत. त्यातला एक जण म्हणाला ‘मी जे ऑफिसमध्ये बनवतो त्याचं व्यसन मला स्वतःलाचं लागलेलं आहे असं माझ्या लक्षात आलं. माझी दोन मुलं मला सारखी बोलवत असतात आणि मी फोन मध्ये दंग असतो.’

कसंय ना, माझ्या लहानपणी सुद्धा मुलांना वेळ न देणारे आई बाबा होते आणि आजही आपल्या मुलांना वेळ देणारे आई बाबा आहेतच की.

एखाद्या गोष्टीचं व्यसन लागणं, एखाद्या माणसाच्या-विचारसरणीच्या आहारी जाणं, आपल्या माणसांना वेळ न देणं, प्रसिद्धीच्या मागे लागणं, अनावश्यक गोष्टींना महत्व देणं, ‘लोक काय म्हणतील’ याचा प्रमाणापेक्षा जास्त विचार करणं... हे माणसाच्या स्वभावात आहे. ऑनलाईन माध्यमांनी  आपल्याला हे शिकवलेलं नाही. त्यांनी आपल्यातल्या उपजत प्रवृत्तीचा फायदा करून घेतला आहे बस. आणि मनुष्याच्या इतिहासातला असा कोणता शोध आहे ज्याचा मनुष्यानं दुरुपयोग केलेला नाही?

व्यसन लागलंय हे मान्य करणं अवघड आहे. एकदा ते मान्य केलं की सोडवणं अवघड नाही. पण आता आपल्या लक्षात आलेलं आहे ना की आपण उगाच फेसबुक आणि इन्स्टा वर स्क्रोल करत बसतो, दिवसातले खूप तास ऑनलाईन माध्यमांमध्ये जातात, आपण जाहिरातींना बळी पडतोय, आपण मनाने एकलकोंडे आणि विचाराने टोकाचे होत चाललोय... आपण स्क्रोल करत राहू असा कंटेंट ही माध्यमे आपल्याला पुरवत राहतात, आपल्या गरजा वाढवून मग त्या गरजांची पूर्तता करणाऱ्या जाहिराती आपल्याला दाखवतात, लाईक-कमेंट-शेअर.. ट्रेंडीग होण्याचं खूळ त्यांनी माझ्या मनात पेरलेलं आहे, मी एकतर्फी कंटेंट वाचत-एकतर्फी व्हिडीओ बघत फार एकसुरी होत चाललीय. आणि हे सगळं साधलं जातंय त्या अल्गोरिदमच्या मदतीने.

बाबा सांगतात त्यांना नाटकांचं फार वेड होतं. पैसे साठवून, कुठच्या कुठे चालत जाऊन ते नाटक बघायचे, रविवारी रस्सा मंडळांमध्ये तांबडा-पांढरा, थोडं कमवायला लागल्यावर मित्रांसोबत पार्ट्या.. मी त्या वयात आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की ‘ते बाबा’ मी कधी पाहिलेलेच नाहीत. मी त्यांचं वाचनाचं वेड पाहिलं, गणिताचं वेड पाहिलं, बागकामाचं वेड पाहिलं. ‘व्यसन लागतंय असं वाटलं तेव्हा सोडून दिलं....’, ‘प्रायोरिटीज बदलतात ना...’, ‘चव कळून, ती आवडून मग ती सोडून देण्यात मजा आहे....’, ‘माझ्या मनावर माझा ताबा असायला पाहिजे ना.. म्हणजे सोपं नाही ते.. पण गोल तो असायला पाहिजे ना....’ साधारण अशा अर्थाच्या सहज वाक्यांनी मला बाबांनी व्यसन करण्यातली आणि व्यसन सोडण्यातली मजा सांगितली. 

सोशल डायलेमामध्ये ते म्हणाले की आपण त्यांचे कस्टमर नाही तर प्रोडक्ट्स आहोत. मोठ्या मोठ्या कंपन्या आपण त्यांच्या वस्तू विकत घ्याव्यात म्हणून आपला डेटा आणि तिथले अल्गोरिदम वापरतात, राजकीय पक्ष प्रोपोगँडा करण्यासाठी ऑनलाईन माध्यमं वापरतात. पण यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. हे ते खूप पूर्वीपासून करत आलेले आहेत. फक्त आता जरिया बदलला आहे एवढच. माणसाने नेहमीच गर्दीला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिटलरच्या मागे देखील गर्दी उभी राहिली आणि गांधींच्या मागे देखील उभी राहिली. गर्दी मॅन्युप्युलेट  होत आलेलीच आहे. गर्दीसाठी गर्दीलाच उभं राहावं लागेल, कारण आर्थिक मंदी असो,  दंगे असोत, युद्धं असोत.. बळी गर्दीतल्या माणसाचा जातो महालातल्या नाही.

ती डॉक्युमेंटरी नक्कीच अस्वस्थ करणारी आहे पण त्याचवेळी जागं करणारी देखील आहे. माणसाने बनवलेल्या कम्प्युटरशी माणसाला लढता येणार नाही? अल्गोरिदम, डेटा, कम्प्युटर.. मशीन्स प्रेडीक्टेबल आहेत.. माणूस प्रेडीक्टेबल नाहीय ना.! आपल्याला भावना आहेत आणि ही केवढी जमेची बाजू आहे. आपल्यात संवेदनशीलता आहे ही केवढी जमेची बाजू आहे. आपल्यात सद्सदविवेक आहे ही केवढी जमेची बाजू आहे. वरून कोणी कितीही कृत्रिम रोपण केलं तरी आपला आतला आवाज कोणाला हॅक करता येऊ शकत नाही. एक असं सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक  वातावरण आपण तयार करू शकलो जिथे आप्तेष्ट आहेत, छंद आहेत, गुंगून जाता येईल अशा स्वैपाकापासून-साफसफाईपासून-बासरी वाजवण्यापर्यंत अनेक गोष्टी आहेत, जिथे शांतता प्रिय आहे, जिथे द्वेष वर्ज्य आहे तर कुणाची बिशाद आहे आपल्याला विकत घेतील, तालावर नाचवतील!!

मी कदाचित थोडी ऑप्टीमिस्टिक वाटत असेन .. आहेही.. पण कोण नाही? आपण सगळेच ऑप्टीमिस्टिक आहोत. आणि तोच आपल्यातला सर्व्हावल इंस्टिंक आहे.

पण स्वातंत्र्यामधे एक स्वॅग आहे....

 



ज्या रूढी आपण इतक्या श्रद्धेने पाळत असतो त्याचं मूळ किती गमतीदार असू शकतं हे सांगणारी एक गोष्ट मध्ये माझ्या ऐकण्यात आली. लेखक माहिती नाही पण मी त्यांची ऋणी आहे.

गोष्ट अशी ... एक गाव होतं. गावात मांजरांचा सुळसुळाट झाला. पुजेअर्चेला ठेवलेलं तीर्थ, प्रसाद यांची नासाडी करण्यात मांजरांना समाधान मिळत असे. एके दिवशी एका घरातल्या मुलीला एक कल्पना सुचली. पूजेच्या दिवशी तिने मांजराला बुट्टीखाली ठेऊन त्यावर दगड ठेऊन दिला. पूजा यथासांग पार पडली. मग ही कल्पना सगळ्या गावानं उचलली. वर्षं सरली, काळ लोटला... कालांतरानं मांजरांची संख्या कमी कमी होत गेली. पूजेच्या दिवशी बुट्टीखाली मांजर ठेवायची प्रथा मात्र राहिली. आता गावात कोणाकडे पूजा असेल तर गावभर भटकून मांजर शोधून आणतात आणि त्याला बुट्टीखाली ठेवतात. एखाद दुसरंच मांजर आहे गावात पण त्याची मागणी वाढली आहे. तशी पद्धतच आहे ना त्यांच्यात. तशी प्रथाच पडली आहे.

अशा आपल्या सगळ्या समजुती, लहानपणापासून ऐकलेली कथा-पुराणे सगळ्यांना सुरुंग लावण्याची ताकद ज्योतिबा फुलेंच्या ‘गुलामगिरी’ मध्ये आहे.

‘गुलामगिरी’ कालच वाचून पूर्ण केलं. मत्स्य, कच्छ, विप्र, राक्षस, ब्रह्मा अशा कित्येक हिंदू संकल्पनांचं मूळ फुलेंनी सांगितलं आहे. कोजागिरी, पक्ष पंधरवडा, दिवाळी यांची कारणे सांगणारा इतिहास लिहिला आहे. जानवं, चार तोंडाचा ब्रह्मा, ज्योतिबा-खंडोबा-म्हसोबा यांची जन्मकथा सांगितली आहे. ‘गुलामगिरी’ हा ज्योतिबा आणि धोंडीबा यांचा संवाद आहे, आणि तोही सॉक्रेटीसच्या धैर्याने केलेला.

‘गुलामगिरी’ इसवीसन १८७३ मध्ये प्रकाशित झालं. त्यांच्या भाषेच्या दुर्बोधपणावर, व्याकरणावर, त्यांनी मांडलेल्या मतावर टीका देखील झाली.

फुल्यांनी लिहिलं ते सगळं आहे तसं खरं नसेलही, माहिती नाही. (फुलेंनी सगळ्या गोष्टी इतक्या convincingly लिहिल्या आहेत की ‘हां हे असं झालं असेल, बरोबर आहे, शक्यता आहे, हां रे’ असेच विचार वाचतांना येतात) पण एका क्षणासाठी त्यातल्या माहितीचा खरेखोटेपणा बाजूला ठेवला तरी गुलामगिरीमध्ये घेण्यासारखं मला खूप काही आढळलं.

एकतर फुलेंचं धारिष्ट्य. १८७३ च्या काळात ब्रह्मा, परशुराम, वामन, नरसिंह यांना मनुष्याच्या पायरीवर आणून त्यांच्या कथा सांगणं, चमत्कारांची चिकित्सा करून सत्य शोधण्याचा प्रयत्न करणं आणि तेही फुलेंसारख्या ब्राह्मणेतराने; ही सोपी गोष्ट नव्हती. दुसरे म्हणजे त्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी लॉजिकली बरोबर वाटतात.

‘आपल्याकडे हे असं करतात’ ‘आपल्यात हे चालत नाही’, ‘आपल्यात हे असं असतं’ ही वाक्यं पिढ्यानपिढ्या आपण पुढच्या पिढीला सांगत आलो. ‘गुलामगिरी’ आपल्याला प्रश्न करायला मदत करते, ‘असं का?’ असं विचारायला चालना देते. ‘कारणमीमांसा’ ही डोळे मिटून मागे चालण्यापेक्षा इंटरेस्टिंग आहे हे ‘गुलामगिरी’ मधून कळू शकेल.

साहजिकच याचे आचरण सोपे नाही. स्वस्त नाही. पण गुलामगिरीपेक्षा स्वातंत्र्यामध्ये साहजिकच एक स्वॅग आहे....

सत्य


आपण स्वतंत्र विचारांचे आहोत असा समज बऱ्याच लहानपणापासून मी पाळलेला होता. पण

जसं जसं मी माणसांना ऐकायला लागले, पुस्तकं वाचायला लागले, चिंतन करायला लागले तसं माझ्या लक्षात यायला लागलेलं आहे की आपली मतं स्वयंभू नाहीत. 

कळत-नकळत आपण कुणाच्या ना कुणाच्या प्रभावाखाली निश्चित आहोत. हा प्रत्येक प्रभाव तावून-सुलाखून घ्यायचा, त्याची मर्यादा ओळखायची, काही स्वीकारायचं-काही बेडरपणे त्यागायचं- एवढं मी ठरवलं आहे.

या प्रवासातून असं काही सत्य मला शोधायचं आहे जे कुठल्याही प्रभावाखाली आणि कुठल्याही प्रभावाशिवाय देखील अचल राहील.