हा लेख मी फक्त स्त्रियांच्या वतीने लिहिलेला नाही.


याआधीचे स्त्री-पुरुष समानतेविषयीचे काही लिखाण वाचण्यासाठी या लिंक देत आहे. 

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3167922473289262&id=100002146226513&scmts=scwspsdd&extid=V9K7YuIvF6dogDbq








स्त्री-पुरुष समानातेविषयी माझ्यासारखे लोक बोलतात तेव्हा काही गोष्टी गृहीत धरलेल्या असतात,

1.    स्त्री- पुरुष समानतेविषयी बोलताना सगळ्या स्त्रिया माझ्या बाजूच्या असतीलच असं नाही.

2.    स्त्री-पुरुष समानतेच्या थेट/वळणावळणाने विरोधात बोलणाऱ्या स्त्रिया स्वतः पुरुषसत्ताक पद्धतीच्या बळी आहेत. त्यामुळं त्यांच्याशी लढावं लागलं तरी लढताना दृष्टीकोन सहानुभूतीचा ठेवावा लागेल.

3.    तत्व म्हणून स्त्री-पुरुष समानता स्वीकारली म्हणजे लगेच उद्यापासून जग बदलेल असं होणार नाही. तो प्रवास दोघांनी मिळून करावा लागेल.

मुळात तत्व म्हणून स्त्री पुरुष समानता मानताना देखील लोक अटी घालतात. स्त्रीने सशक्त व्हायला पाहिजे म्हणे त्यासाठी. इथे दोन मुद्दे आहेत, पहिले म्हणजे प्रचंड वेदना सहन करून एका स्त्रीनेच तुम्हाला जन्माला घातलेलं आहे. त्यामुळे शारीरिक दृष्ट्या तर ती सशक्त आहेच. बाकी राहिला प्रश्न शिक्षण, नोकरी याचा. स्त्रीनेच काय प्रत्येकाने शिक्षण घ्यावं आणि आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहावं हेच योग्य आहे- मग ती स्त्री, पुरुष कोणी असो. पण थोडा विचार केला तर लक्षात येईल की आत्ताचे पुरुष वर्चस्व पुरुषाच्या सशक्त असणाऱ्यावर अवलंबून नाही. भित्रा, कमी शिकलेला, न कमावणारा असा एखादा मुलगा आईवर, बायकोवर सत्ता गाजवताना तुम्ही आजूबाजूला पाहिलेला नाही? घरची आर्थिक जबाबदारी घेतात म्हणून सत्ता गाजवतात म्हणावं तर बायकोपेक्षा खूप कमी पैसे मिळवणारे आणि तरी बायकोशी माजात वागणारे कितीतरी नवरे मला माहिती आहेत.

"आपल्याकडे पुरुषसत्ताक पद्धती आहे. स्त्री-पुरुष समानता येणं आवश्यक आहे. त्यासाठी स्त्रीला झगडावं लागणार आहे. आणि या सगळ्या प्रवासात मी स्त्री असो की पुरुष असो एक माणूस म्हणून मी समानतेच्या बाजूने आहे" हे आपण सतत घोकलं पाहिजे.

एक स्त्री म्हणून विचार केला तर अनेक आघाड्यावर लढावं लागणार आहे,

1.    स्वतःच्या looks, appearance, dressing याला आपल्या अस्तित्वाचा निकष न होऊ देणे.

2.    आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभं राहणे.

3.    घरी, कॉलेजात, ऑफिसमध्ये, संसारात पुरुषांच्या बरोबरीने काम करणे, आणि महत्वाचं म्हणजे जबाबदारी घेणे.

4.    कष्टाची कामे पुरुषाने करावीत अशी अपेक्षा न करता स्वतःला कष्टाच्या कामांसाठी तयार करणे.

5.    मुलाने प्रपोज केलं पाहिजे, त्यानंच गिफ्ट दिलं पाहिजेत, मुलानंच ड्रायव्हिंग केलं पाहिजे, त्यानंच खर्च केला पाहिजे असे समज डोक्यातून काढून टाकणे.

6.    स्वतःच्या शिक्षणाचा, करिअरचा, कपडे-दागिने, शाकाहारी-मांसाहारी खाण्याचा  निर्णय स्वत: स्वतःसाठी ठामपणे घेतला पाहिजे.

7.    भाऊ, नवरा दोघांच्या बरोबरीने दोन्ही घरी आर्थिक व्यवहारात, सर्व प्रकारच्या निर्णयात आणि जबाबदारीत बरोबरीने सहभागी झालं पाहिजे.

8.    अंधश्रध्दाना बळी नाही पडलं पाहिजे.

9.    सतत स्वतःला प्रश्न विचारत, माणूस म्हणून स्वतःवर काम करत राहिलं पाहिजे. बदलांना स्वीकारलं पाहिजे नव्हे प्रसंगी बदल घडवले पाहिजेत.  

10.बरोबरीचा अधिकार उपभोगताना बरोबरीने जबाबदारी घेतली पाहिजे.

थोडक्यात काय तर स्त्री म्हणून आपल्याविषयी prejudices नकोत असं वाटत असेल तर previleges सोडावी लागतील.

उगाच लग्नात प्रोब्लेम येईल, उगाच घरचे दुखावतील, सणा-वाराला तमाशा नको, एवढीशी तर गोष्ट आहे, तो कमावतोय ना भरपूर, काही कमी पडत नाहीय ना, बाकी मुलींचे नवरे-सासरचे लोक किती छळतात त्यांना, त्यापेक्षा आपलं बरं आहे ना, मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला ही वाक्य कायमसाठी मराठी भाषेतून काढून टाकली पाहिजेत.

अस विचार करणाऱ्या स्त्रियांना मला सांगावसं वाटतं,

बाई गं तुझ्या लग्नात alrady प्रोब्लेम आहे. फक्त तू denial mode ला गेली आहेस इतकंच.

घरचे दुखावतील म्हणून तू शांत राहतेस. पण दुखावली जात आहेसच ना. आणि तू समजुतीने घेतेस म्हणून ते तुझं कौतुक करतायत का? आणि त्यांच्या मनासारखं वागून देखील हसऱ्या चेहऱ्याने वावरतायत का? माझ्या आईच्या भाषेत कितीही बाबापुता केलं तरी यांची तोंडं हगायला गेलेली. मग कशाला त्यांच्या दुखण्याचा एवढा विचार करतीयस?

सणा वाराला तमाशा नको असं त्यांना पण वाटत असेल तर तू बोललीस की तुझ्या मनासारखं करून गप बसतील ते. सणवार चांगले जाणं ही तुझ्या एकटीची जबाबदारी आहे का? आणि असेल तर का याचा कधी विचार केला आहेस?

एवढीशी गोष्ट आहे. असं तू म्हणतेस. तुझी एवढीशी गोष्ट तितक्याच समजुतीने ते सोडून देतात?

तिच्यापेक्षा माझं बरं. मग तू काय आता तुझ्यावर हात उचलायची वाट बघती आहेस काय? फक्त 'मारहाणीलाच' छळ म्हणता येता का?

मग आपल्यात आणि त्यांच्यात फरक काय. या वाक्याचा तर अर्थच मला कळलेला नाही. ते तुला बरोबरीने वागवत नाहीत इथेच त्यांनी त्यांच्यात आणि तुझ्यात फरक केलेला आहे. आता वेगळ्यानं तुला फरक दाखवत बसायची काय गरज आहे?

पुरुषसत्ताक संस्कृतीत वाढलेल्या पुरुषासाठी देखील अशा समानतेने जगणाऱ्या स्त्री सोबत वावरणं थोडं अवघड जाणं स्वाभाविक आहे. पण 'समानता हवी' हे तत्वं म्हणून एकदा पुरुषांनी स्वीकारलं की तेव्हाचं साहचर्य आत्तापेक्षा कितीतरी प्रगल्भ असेल अशी मला खात्री वाटते. एका दिवसात अमुलाग्र बदल होणार नाही, हे तर आहेच. फक्त तो अपोआप होणार नाही. तो आपल्या आपल्या कुवतीप्रमाणं आपल्याला घडवावा लागेल.  

डॉ दाभोलकर वैज्ञानिक दृष्टीकोनाच्या बाबतीत म्हणायचे तेच तत्व आपण वळवून स्त्री-पुरुष समानतेसाठी उपयोगात आणलं तर?

पहिली पायरी म्हणजे स्त्री-पुरुष समानता हा विचार म्हणून स्वीकारणं.

दुसरं म्हणजे स्त्री-पुरुष समानतेचा प्रचार करणं.

आणि तिसरं म्हणजे स्त्री-पुरुष समानता आचरणात आणणं.

यात सगळे मुद्दे आले असतील असं नाही. त्यामुळे वाचणाऱ्यांनी नक्की त्यांचे इनपुट्स द्यावेत. फक्त चुका काढण्यासाठी जेव्हा अशा लिखाणावर लोक बोट ठेवतात तेव्हा नाराज व्हायला होतं. स्त्री-पुरुष समानता तुम्ही मान्य करत असाल तर तुमचा टोन positive असावा असं मला वाटतं. विचारात, आचारात काय सुधारणा करायची ती आपण करू, चर्चा करू. पण आपण एका बाजूचं असावं आणि आपलं ध्येय समानता असावं एवढं मला वाटतं. उगाच ओळखीच्या एखाद्या स्त्रीचं उदाहरण देऊन गोष्टी जनरलाईज करू नयेत.

हा लेख मी फक्त स्त्रियांच्या वतीने लिहिलेला नाही. स्त्री-पुरुष समानता मानणाऱ्या सर्व स्त्री-पुरुषांच्या बाजूने पुरुषसत्ताक पद्धतीला टिकवणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या विरोधात लिहिलेला आहे. वाचणाऱ्या व्यक्तीने ठरवावं की ती कोणत्या बाजूची आहे.


यातून माझा अभिमान प्रगल्भ होईल. आंधळा होणार नाही.....

 


'अभिमान' म्हणजे काय?

अभिमानामध्ये काय काय समाविष्ट होतं?

मला जे आयतं, माझ्या प्रयत्नांशिवाय लाभलं त्याचा मनापसून स्वीकार. म्हणजे माझे आई बाबा, नातेवाईक, घराणं, माझं नाव, आडनाव, जात, धर्म, गाव, भाषा, देश.  

मी जे कमावलं त्याची जाणीव. म्हणजे माझे निर्णय, कष्ट, सातत्य, सन्मार्ग, यश, माझ्यातल्या करुणा-प्रीती-क्षमा अशा मूळ तत्वांना ओळख देऊन त्यांचा जाणूनबुजून वाढवलेला पसारा, माझ्यातल्या animal instinct वर काम करत माझ्यातला मी घडवलेला माणूस.

बरं पुन्हा 'स्वीकारायचं' म्हणजे काय?

त्याची ओळख करून घ्यायची, माहिती घ्यायची, इतिहास समजून घ्यायचा, प्रत्येक गोष्टीचे कंगोरे-खोली-लांबी-रुंदी समजून घ्यायची. साहजिकच या प्रवासात चांगल्या-वाईट दोन्ही गोष्टी समजतील. काळानुरूप मूळ चांगल्या पण आता वाईट ठरणाऱ्या गोष्टी सापडतील. माझ्या नातेवाईकांच्या हातून गुन्हा झाला, माझ्या धर्मातल्या अमानवी गोष्टी मला समजल्या, माझ्या गावाच्या – देशाच्या मर्यादा लक्षात यायला लागल्या. तरी जन्मानं मला मिळालेल्या गोष्टींचा अभिमान बाळगायचा, त्यांना स्वीकारायचं म्हणजे त्यांना defend करायचं? की खुल्या मनानं ते मान्य करून उपाय शोधायचा?

माझी बहिण व्यासनांध झाली तर तिचा मार्ग चुकतो आहे हे स्वीकारून तिला त्यातून बाहेर आणण्यासाठी प्रयत्न करेन ना मी? आणि ते मार्ग दारू-सिगारेट विकणाऱ्या लोकांना दोष देत बसणारे नसतील तर माणूस म्हणून तिला व्यसनातून परावृत्त करणारे असतील. हाच न्याय माझी भाषा, जात, धर्म, गाव, देश यांच्या बाबतीत लागू होईल ना?

अभिमान बाळगायचा म्हणजे criticism ऐकायचं नाही असं तर नव्हे ना?

चुकीच्या, काळाआड गेलेल्या गोष्टीना defend करत रहायचं असं तर नव्हे ना?

उदाहरण म्हणून ... सीतेची सत्वपरीक्षा त्या काळात त्या समाजात योग्यही असेल. आज तिला आपण चूक म्हणलं पाहिजे, परशुरामानं वडिलांच्या सांगण्यावरून आईला मारून टाकणं तेव्हा पितृभक्ति असेल- आज आपण त्याला चूक म्हणलं पाहिजे.. अशा अनेक नव्या-जुन्या गोष्टींची यादी करता येईल. ज्या गोष्टी महत प्रयासानं माणूस म्हणून आपण बदललेल्या आहेत.. आपली उत्क्रांती थांबलेली नाही.

माझ्या भावानं एखाद्या स्त्रीला फसवलं तर भाऊ चुकला असं मी म्हणलं पाहिजे- भावावरचं आंधळं प्रेम सोडून मी त्या स्त्रीची बाजू घेतली पाहिजे, माझ्या धर्मातल्या उच्च-नीचता मानणाऱ्या-वाढवणाऱ्या गोष्टी त्यागून मी माझे जात-धर्म अपग्रेड केले पाहिजेत  ना? माझ्या आणि माझ्या गोष्टींच्या कमजोरी, मर्यादा मी मान्य केल्या पाहिजेत. आणि त्या दूर होण्यासाठी किमान माझ्या वैयक्तिक स्तरावर प्रयत्न करत राहायला पाहिजे. याला खऱ्या अर्थाने 'स्विकारणं' असं म्हणता येईल.

आणि यातून माझा अभिमान प्रगल्भ होईल. आंधळा होणार नाही.  

अहिंसा, पर्यावरणाचं संवर्धन, समता, स्वातंत्र्य, लोकशाही अशी काही तत्वं हजारो वर्षांच्या मानवी इतिहासातून आपण शिकलो आहोत. ही तत्वं पुन्हा पुन्हा सिद्ध झालेली आहेत. अभिमानाची चुकीची व्याख्या आपल्या माणूस म्हणून कमावलेल्या शहाणपणाच्या आड येता कामा नये.

नातं रुजावं खोल..सांभाळावं लागू नये..


 

प्रेमावर आपण भरपूर बोलतो, भरपूर लिहितो. पण सॉक्रेटीसच्या खोडीप्रमाणं प्रेमाची व्याख्या करायला जात नाही.

एखाद्या माणसाचा सहवास हवासा वाटणं म्हणजे प्रेम?

एखादा माणूस पटणं म्हणजे प्रेम?

एखाद्या माणसावर हक्क वाटण्याइतपत तारा जुळणं म्हणजे प्रेम?

एखाद्या माणसाच्या आपलं असण्यानं सुरक्षित वाटणं म्हणजे प्रेम?

मानसिक, शारीरिक, सामाजिक संकोच ज्या माणसासमोर राहत नाही ते प्रेम?

सामाजिक अनुरूपता म्हणजे प्रेम?

की वैचारिक भारलेपण म्हणजे प्रेम?

शारिरीक आकर्षण हे प्रेमाचं श्रेय असतं का खरंच?

एखाद्याकडून शून्य अपेक्षा आणि लाखभर सदिच्छा म्हणजे प्रेम?

की न ठरवता, न मोजता, विश्लेषण न करता ऋतूत झाड मोहरून यावं तसं दोघांनी एकमेकांच्या आयुष्यात मिसळून जाणं म्हणजे प्रेम?

वेळ, वय, ऊन- पाऊस, माती, बीज... कुणाचं श्रेय नाही यात?

एखादा माणूस उलगडत जाईल तसा पटत जायला हवा.

'सोबत' घडणं आणि 'सोबत' निभावणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.  

प्रवाह मिसळतात आणि रेल्वेचे रूळ? एकत्र पण, समांतर....

तुझा-माझा प्रवाह झाला पाहिजे,........

आपसूक, अलगद, नकळत....

बस् एवढी एकच अट आहे, की, सहवास घडावा..निभावावा लागू नये.

नातं रुजावं खोल..सांभाळावं लागू नये..

आपलं अद्वैत असावं- समांतर चालावं लागू नये..

बस् एवढी एकच अट आहे...की,

तुझा-माझा प्रवाह झाला पाहिजे,........

आपसूक, अलगद, नकळत....

 

 

परवडत नसेल तर तसं मान्य करा नाहीतर धंदा गुंडाळून गप्प बसा..


 

यावर्षीच्या दिवाळी अंकांच्या जाहिराती बघून मला आठवण झाली. मागच्या वर्षी एका दिवाळी अंकाने माझ्याकडून कथा मागवून घेतली होती आणि दुसऱ्या एका दिवाळी अंकासाठी मी एक अनुवाद करून दिलेला होता. आजतागायत मला त्याचे पैसे मिळालेले नाहीत. पहिल्या सहा महिन्यामध्ये मी पाठपुरावा केला. त्यांनीही पैसे देण्याचं पुन्हा पुन्हा कबूल केलं. पण पैसे दिले नाहीत. दुसऱ्याच्या कष्टाचं खाऊन यांना झोप कशी लागते याचं मला आश्चर्य वाटतं.

पैशांचे वांदे झाले असतील तर तसं स्पष्ट सांगून त्यांनी हा दिवाळी अंकाचा उपद्व्याप बंद करायला हवा होता. पण असे अनेक फुकटे लोक दरवर्षी माझ्यासारखा नवीन बकरा शोधतात आणि आपले दिवाळी अंक भरतात. छापून येण्यात लेखनाची इतिकर्तव्यता मानणारे लोक 'जाऊ दे' म्हणून सोडून देतात.

लेखकाची प्रतिमा, फोफावलेले लेखक-कवी, हौशी आणि व्यावसायिक लेखक अशा अनेक विषयांवर वेगळ्याने विस्तृत बोलायला हवं.

पण इथे मुद्दा अगदी सरळ कष्टाच्या आणि हक्काच्या पैशाचा आहे. मग तो लेखक असो नाहीतर हमाल. योग्य, पुरेसा मोबदला मिळायलाच हवा.

ठराविक मुदतीत आपले पैसे मिळाले नाहीत की बोभाटा करून ही गोष्ट सांगितली पाहिजे सगळ्यांना. हजार दोन हजारसाठी काही आपण कोर्टात जाणार नसतो म्हणून यांचं फावतं.

आणि निर्लाज्जासारखी पुढच्या वर्षी हे लोक आपल्यला दिवाळी अंकाची जाहिरात पाठवतात. परवडत नसेल तर मान्य करा, स्पष्ट कल्पना द्या, सांगा आणि धंदा गुंडाळून गप्प बसा. फसवू नका. फक्त लेखकच नव्हेत; वेगवेगळ्या ठिकाणी असे एकएकटे काम करणारे लोक असतात. त्यांच्या अशा छोट्या मोठ्या रकमा बुडवल्या जातात. राजरोसपणे बुडवणाऱ्यांचे धंदे चालू राहतात. आपल्या कौशल्याचा, कष्टाचा मान राखला जात नाही. आणि आपण काय करू शकतो?

पुढच्या वेळी पैशांचं स्पष्ट बोलल्याशिवाय काम घ्यायचं नाही हा धडा. ठीकाय मला हा धडा मिळाला. पण यंदा त्यांनी अशी दुसरी नवी मृदगंधा शोधली असणार. दुनियादारीच्या एका धड्यासाठी ती यावर्षी फुकट काम करून देणार.

याला काही उपाय नाही?

 

 

''अशीच रीत असते, आपल्याकडे हीच पद्धत आहे, असंच करावं लागतं"....

 


सणा-वारांविषयी माझ्या मनात पहिल्यापासून एक बंडखोरी आहे. 

आई सोवळ्यात असताना थेट अंथरुणातून उठून तिला मिठी मारणं, नैवेद्य दाखवायच्या आधी पदार्थ खाणं, मासिक पाळीत बाजूला बसलेल्या बाईला मुद्दाम शिवणं, अंघोळ न करता गणपतीच्या आरतीला उभं राहणं, सत्यनारायणाला नमस्कारच न करता थेट प्रसादासाठी हात पुढं करणं, चांगल्या कार्यक्रमाला काळे कपडे घालणं, उपवासाच्या दिवशी अंडी खाणं ही यादी बरीच मोठी आणि गंभीर होत जाऊ शकते. 

मुद्दा हा आहे की 'हे करायचं असतं' म्हणलं की 'मी नाही करत जा' हे ठरलेलं आहे. 

परवा दसऱ्याला मला पर्याय होता, दाराला तोरण लावण्याचा किंबहुना न लावण्याचा. पण मला दसरा म्हणाल्यावर काय आठवत होतं?, आम्ही भावंडांनी मिळून केलेल्या झेंडूच्या माळा, आईनं चक्का टांगून केलेलं केशर श्रीखंड, दिवाळीची चाहूल देणारे नवेनवे कपडे, एकत्र जेवण, लोळून काढलेली दुपार आणि संध्याकाळभर गल्लीत फिरून दिलेलं सोनं, घरात सोनं घेऊन येणारी आजूबाजूची चिल्लीपिल्ली. ...

या सगळ्यामध्ये न पटण्यासारखं , न आवडण्यासारखं काहीच नाही. संक्रांतीबद्दल पण हेच, गणपतीचं पण हेच, नवरात्री-होळी-दिवाळी-आषाढी... सगळ्याविषयी हेच. 

सौंदर्य, संगीत, सहभोजन यात खटकण्यासारखं काय आहे?

आणि मग तरीही मग माझ्यामध्ये ही बंडखोरी कुठून आली? तिचं मूळ काय? 

हे सगळं नाकारून फक्त माझं मन शांत होत नाही तर जे ''करू नये'' म्हणून सांगतात ते करून दाखवायची माझी तयारी असते. हा असा सणांविषयीचा सुप्त द्वेषच माझ्यात आलाय कुठून?

खूप विचार केल्यावर मला त्याचं मूळ सापडलं. एकंदरीत सणा- वारांविषयीचा द्वेष, संसारिक गोष्टीतील निरुत्साह, हौस- श्रद्धा यांचा अजिबात अभाव... या सगळ्यांचं कारण माझ्या सगळ्या नात्यातल्या, ओळखीच्या तायांमध्ये आहे. माझ्या कळत्या वयात मी या सणा- वारांच्या दिवशी माझ्या तायांना राबताना पाहिलं, 

''अशीच रीत असते,आमच्यात असंच असतं, हे करावंच लागतं, आपल्यात हीच पद्धत आहे" अशी वाक्यं ऐकत त्या हे सण समारंभ करत राहिल्या. 

पहाटे उठून रांगोळी काढणारी पण तीच, सगळ्यांचा चहा करणारी पण तीच, सगळ्यात आधी अंघोळ करणारी पण तीच, मिक्सर असताना पाट्यावर पुरण वाटणारी तीच, सोवळ्यात स्वैपाक करणारी तीच, वाढणारी तीच, खरकटं उचलणारी तीच, दुपारी सगळे खाऊन पिऊन आडवे झाले की बाईला भांडी काढून देणारी तीच आणि सणासुदीला यांच्या गप्पा रंगल्या की वेळी अवेळी चहा- कॉफी टाकणारी पण तीच. 

तिला दमायला वेळ नाही, थकलेल्या चेहऱ्यानं बसून राहायला परवानगी नाही... सण आहे ना !! त्यामुळं तिनं साडी पण नेसली पाहिजे, दागिने पण घातले पाहिजेत, रांगोळी पण काढली पाहिजे, पक्वान्नाचा स्वैपाक पण केला पाहिजे, कुणाला काही मागायला लागता कामा नये असं छान तिनं वाढलं पण पाहिजे, हसत खेळत यांच्या गप्पात सामील पण झालं पाहिजे.  

माहेरी असली काय, सासरी असली काय, पाहुण्यांकडे असली काय माझी ताई आपली सगळीकडे पदर खोचून उभीच, सतत कामातच.. ती कायमच कशी शेवटच्या पंगतीला जेवते?

या रूढी-परंपरा, सणवार, उपास तापास, देव धर्म अशा रूपातून आलेल्या हट्टी, आग्रही, माजुरड्या, क्रूर, पितृसत्ताक संस्कृतीसमोर मी माझ्या या नात्यातल्या, ओळखी-पाळखीच्या तायांना सतत शरणागती पत्करताना पाहिलं, हतबल झालेलं पाहिलं. 

त्या देखील नटल्या, हसल्या, रमल्या... नाही असं नाही. 

पण हे सगळे निर्णय त्यांचे होते? त्यांनी घेतलेल्या निर्णयांच्या वेळी, त्यांनी स्वखुशीने केलेल्या निवडीच्या वेळी त्यांच्यासमोर पर्याय होते? आणि असतील तर ते कुठले होते? 

झेंडूच्या फुलांचं तोरण करून दरवाजाला लावायचं की नाही, कधी लावायचं? हे पर्याय आज माझ्याकडे उपलब्ध होते. माझ्या तायांच्याकडे हे पर्याय होते?

त्या रमल्या की हरवून गेल्या? त्यांच्यासाठी हे सण फक्त सहज स्वाभाविक सौंदर्य, संगीत आणि सहभोजन होतं? 

त्याग, सहनशक्ती यांना दिलेलं अनावश्यक महत्व, तिच्या कर्तव्यांचं केलेलं अवडंबर, आणि संस्कारांच्या नावाखाली तिला कमजोर बनवणारं तिचं माहेर... हे मूळ आहे माझ्या बंडखोरीचं... ही साखळी माझ्यापाशीच तुटली तर किती बरं होईल?

आपले सण सौंदर्य, संगीत, सहभोजन आणि सजण्या-सवरण्याचे आणि संपूर्ण ऐच्छिक झाले तर किती बरं होईल?  


माझी नशेची लिस्ट वाढतच चालली आहे. दारू, देव आणि आता डेली सोप..

 


शाळेत असताना मी मालिका बघायचे. आमच्या घरी टीव्ही नव्हता तेव्हा शेजारी आजोबांकडे जाऊन बघायचे. सध्याच्या चालू मालिका बघता 'मी पूर्वी मालिका बघायचे' हे सांगण्याची सोय राहिलेली नाही. पण खरंच बघण्यासारख्या मालिका तेव्हा बनत होत्या. 'झोका' पासून 'साराभाई vs साराभाई' पर्यंत बरीच मोठी लिस्ट होऊ शकेल. 

आजच big bang theory बघून पूर्ण केली. 

मालिका.. म्हणजे टीव्ही किंवा ऑनलाईन प्लॅटफॉर्म कुठल्याही माध्यमातून माझ्यापर्यंत येणाऱ्या. 

मालिकांमधून मिळणारा आनंद, मनोरंजन, विचार या सगळ्या गोष्टी एका बाजूला. म्हणजे त्या आहेतच. पण मला वाटतं मालिका या प्रकारामध्ये एक प्रकारचं हिप्नॉटीझम आहे.  माझं मानसिक, बौद्धिक रिकामपण, घरातलं एकटेपण यावर एक पर्याय म्हणून मी मालिका बघत राहते. उद्यासाठी काही प्लॅन नसणं, भविष्यासाठी ध्येय नसणं, सातत्यानं जपलेला छंद नसणं- अशा जाणीवा टाळण्यासाठी माझी बुद्धी गोठून राहणं गरजेचं असतं आणि ते काम या मालिका करत असाव्यात. वेळेचा विसर पडायला मदत करणाऱ्या, बुद्धीला गुंतवून ठेवणाऱ्या, वास्तवापासून वेगळ्या जगात घेऊन जाणाऱ्या या मालिका म्हणजे एक नशा, एक व्यसन तर नाही ना? 

मालिका नसतील तर माझा वेळ जाईल? 

स्वतःला टाळण्यासाठी मी मालिकांमध्ये डोकं खुपसून बसते का? 

एक मालिका संपली की मला रिकामपण येतं. शेवटच्या एपिसोडला मी अस्वस्थ होते. पुन्हा नवीन मालिका बघायला सुरु करेपर्यंत अस्वस्थता कायम राहते. 

माझी नशेची लिस्ट वाढतच चालली आहे. दारू, देव आणि आता डेली सोप...म्हणजे मालिका....

एकामागोमाग एक season वर season बघताना मी वर्तमानापासून पळत असते काय? 

मालिकेशिवाय काही दिवस, महिने मी रहायचं ठरवलं आहे. त्या प्रयोगाचं काय होतंय यावर तेव्हा पुन्हा लिहीन. 

मंगळसूत्र गरजेचं वा पुरेसं नसतं!

 


" प्रतिकांची निर्मिती " हे मनुष्याच्या आत्तापर्यंतच्या प्रवासातलं एक महत्त्वाचं पाऊल आहे. पण त्या प्रवसातलं पुढचं पाऊल आपल्याला अजून टाकता आलेलं नाही. 


आपल्याला न सुटलेल्या कोड्याचा धनी म्हणून आपण ' ईश्वर ' नेमला, मग त्याची मूर्ती बनवली - त्याला सगुण - साकार केलं, म्हणजे प्रतीक तयार केलं.  त्याच्यासमोर नम्र होण्यासाठी ' नमस्कार ' करून प्रतीकात्मक नात नतमस्तक झालो. पुजे- अर्चेच्या नावाने भक्ती केली. भक्तीच्या नावाने कर्मकांडं! हेही पुन्हा प्रतिकच. 


अजूनही आपल्याला प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाची गरज का भासावी ?


आपण हुशारीचं प्रतीक डिग्र्यांना मानतो, श्रीमंतीचं प्रतीक सोना- नाण्याला..
पुरस्कारांची प्रतिकं असतात, अपमानासाठी चपलांचा हार असतो ! गळ्यात मंगळसूत्र - प्रतीकाचं , डोक्यावर टोपी - कोणाच्यातरी नावाची, झेंडे - वेगळ्या रंगाचे, वेगळ्या जातीचे -

ईश्र्वराशी भक्ती, माणसावरचं प्रेम, आदर, विश्वास, कौतुक यासाठी आपण वापरत असलेली प्रतिकं आणि याशिवाय  जगण्यामधली वस्तूंची निखळ गरज यामधलं वेगळेपण आपल्याला अजून समजत नाही.

म्हणजे गळ्यातलं मंगळसूत्र नवरा बायकोंमध्ये मित्रत्वाचं नातं निर्माण करण्यासाठी गरजेचं वा पुरेसं नसतं, हे अजून कळलं नाही आपल्याला ?


प्रतीकांची गरज मला का भासावी ? माझ्या आचरणातून माझ्या अंतरंगात भिनलेली भक्ती, प्रेम, निष्ठा का दिसू नये?
"प्रतिकांशिवाय व्यक्त होणे" हे ते पुढचं पाऊल होऊ शकेल काय?


दारू आणि देव या दोन्ही नशाच!


तुझं अस्तित्व जाणवण्याइतका वेळच सध्या मला मिळत नाही. 'देव सगळं बघतोय' असं आजी म्हणायची. मला ते खरं वाटायचं. त्याच्याकडं सतत काहीतरी मागत राहणं हे देवाशी असलेलं माझं सुरवातीचं नातं होतं. वाईट वागताना 'देव बघतोय' असं वाटायचं पण तेही अगदी लहानपणी पुरतं. मग मी दुनियादारीच्या नावाखाली निर्ढावत गेले. 

हळूहळू देवाचं स्वरूप बदललं. त्याचं अस्तित्व हळूहळू मोठं मोठं होत गेलं, आणि माझं कमी. त्यामुळंच की काय, सगळ्या गोष्टींची जबाबदारी देवावर येत गेली. कारणही तोच, परिणामांना जबाबदारही तोच ! मग सगळंच रामभरोसे होत गेलं आणि मी निष्क्रिय होत गेले. 

दारू आणि देव या दोन्ही नशाच! आपल्याला धुंद राहण्याची, निष्क्रिय राहण्याची मोकळीक देणाऱ्या! दारूपेक्षा देव जालीम. कारण तो कोणालाही वर्ज्य नाही, त्यातून कोणाचीही सुटका नाही आणि त्याला व्यसन म्हणून मान्यताही नाही. 

आता मात्र तर्कांच्या मागं लागून मी त्याचं अस्तित्व विसरत चाललीय वा हळूहळू मिटवत चाललीय म्हणूया.. 

आजीची 'देव बघतोय' ही संकल्पना आणि तुकारामाचा 'देव होऊनिया आलो' हा दावा यांचा परस्पर संबंध असावा. स्वयंशिस्तीशी, आत्मपरीक्षणाशी त्याचा संबंध असावा. 

मी तर्काच्या आधारावर माझंच वागणं तोलून पाहिलं पाहिजे. 'देव बघतोय' म्हणजे 'मी बघतोय'. 

मी बघितलं पाहिजे, मी जबाबदारी घेतली पाहिजे.. मी माझ्या नजरेत 'देव' झालं पाहिजे. 

'कभी कभी लगता है की अपुनही भगवान आहे....' its a good start.. what say??

नवरा...





मी कात टाकती आहे हळूहळूू
आणि अंतर्बाह्य बदलतीय हळूहळू
तुझा मात्र काळा कोट, टोपी 
खुंटीवर अजूनही....

मी माझ्या आई सारखी नाही,
मी तुझ्या आई सारखी देखील नाही,
तू मात्र आजीच्या आठवणीतल्या 
आजोबांसारखा..

माझ्यासाठी फिरत राहिलं 
भिंतीवरचं घड्याळ,
तुझा लोलक हिप्पोक्रसीची
किल्ली संपली की बंद पडणारा...

माझा १५व्या मजल्यावरच्या
हौसेनं सजवलेला फ्लॅट -
आणि तरी त्या फ्लॅटच्या 
मेन डोअरशी तुला दिसतो 
एक उंबरा- मोठ्ठाच्या मोठ्ठा 
रांगोळीनं स्वस्तिक काढून 
हळदी कुंकू घातलेला....

लोक, रुढी, परंपरा...
तुझं समाजमान्य नवरेपण,
माझं मी मानलेलं बायकोपण,
याहून पलीकडे तुला मी कधी 
तुझी मैत्रीण वाटलेच नाही ?

स्वतः तल्या मित्रावर मात 
करणाऱ्या स्वतः तल्या 
नवऱ्यातलं नामर्दपण 
झाकण्यासाठी तू करत 
राहिलास अभिलाषा 
मुलगा होण्याची .. वंश वाढण्याची ..

तू माझा होऊ शकला नाहीस..
स्वतः वाढू शकला नाहीस...
तुझ्या जगण्याच्या चिखलानं
धोपट मार्गावर वाढली 
फक्त एक level _,
Level च नसलेली......

(माझ्या ब्लॉगचे नोटीफिकेशन मिळत राहण्यासाठी मेल आयडी देऊन सबस्क्राईब करा)

माणसाचं टू पॉइंट ओ वर्जन येईपर्यंत तंत्रज्ञानाची घौडदौड फ्रीझ केली तर?

 


सातची बस कधीच सात वाजता यायची नाही. आम्ही ताटकळत येईल त्या बसकडे आशेने पाहत असायचो. लाल डब्ब्याच्या ऐवजी हिरकणी यावी अशी मी मनात देवाकडं प्रार्थना करत असायचे. कारण हिरकणीच्या खिडकीशी माझी उंची पोचायची. 'आता येउदे कधी यायची तेव्हा' असं म्हणून आशा सोडून निवांत बसलं की एकदम राणीच्या थाटात धूळ उडवत ती लाल बस यायची. 7 आणि 8 अशा दोन बसच्या प्रवाशांची झुंबड मग या एकाच बससाठी. 

आई मला सांगायची, 'पटकन जा आणि तीन सीटची जागा पकड'. 

मी चालत्या बस सोबत चालत चालत दरवाजाशी थांबायचे. आपण पहिलेच आहोत म्हणजे जागा मिळणार म्हणून मी खुश. दरवाजा खडखड करत उघडायचा. आतले प्रवासी आधी उतरतील मग आपण आत चढू म्हणून मी उतरत्या प्रवाशांना जागा देत थोडी सरकून उभी राहायचे. तेवढ्यात माझ्या मागे थांबलेली माणसं उतरत्या प्रवाशांना धक्काबुक्की करत आत शिरायला लागायची. तिथं एकदम चेंगराचेंगरी सुरु व्हायची. माझा जीव गुदमरायचा. मी मागे पडायचे. आणि आम्हाला जागा पण मिळायची नाही. 

बऱ्याच वर्षांनी काही व्यावसायिक कामानिमित्तानं फाईव्ह स्टार हॉटेलला जाण्याचा प्रसंग आला.  तिथे 8-8 लिफ्ट होत्या. 15-20 सेकंद लिफ्टची वाट बघताना सुद्धा माझ्या आजूबाजूचे 10-12  जण उतावीळ झाले होते. लिफ्ट आली. मी रांगेत पहिल्या नंबरात होते. आतल्या लोकांना बाहेर येता यावं म्हणून मी थोडी जागा करून दिली. पण माझ्या मागचे लोक आत शिरले. संथ चालणाऱ्या त्या लोकांचा आतून बाहेर आणि बाहेरून आत हा ओघ एकत्रच सुरु झाला. माझा जीव गुदमरला. मी मागे पडले आणि मला ती लिफ्ट मिळालीच नाही. पुढच्या लिफ्टची वाट बघत मी दुसऱ्या लिफ्ट समोर जाऊन परत रांगेत उभी राहिले. 

शिवनेरी मध्ये प्रवास करताना फोनवर मोठ्याने व्हिडीओ लाऊन ऐकणारे प्रवासी कोणाकोणाच्या नशिबात आले आहेत? 

लहान मुलांना मांडीवर घेऊन कार चालवणारे महाभाग कोणी कोणी पाहिले आहेत?

अशा छोट्या छोट्या अनुभवापासून ते अणुबॉम्ब पर्यंत. त्या बॉम्बस्फोटानंतरची जपानची अवस्था, अणु बॉम्ब फेकणाऱ्या अधिकाऱ्याची त्या संहारानंतर पश्चातापातून झालेली अवस्था यावर काही लेख वाचनात आले तेव्हा पुन्हा पुन्हा जीव गुदमरतच राहिला. 

देशादेशांमध्ये तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात चाललेली चढाओढ पाहिली की वाटतं, की हे तंत्रज्ञान वापरण्याची माणसाची लायकी आहे का? आधी आतल्या प्रवाशांना बाहेर उतरू द्यावं आणि मग आपण आत चढावं हो गोष्ट खेड्यातल्या लाल डब्यात चढणाऱ्यांना देखील कळत नाही आणि शहरातल्या फाईव्ह स्टार हॉटेलवाल्यांना देखील कळत नाही. 

आपण सगळ्या तंत्रज्ञानाचा दुरुपयोग करतो हे तर सिद्ध गोष्ट आहेच. पण आपण त्या तंत्रज्ञानाचा उपयोग- वापर देखील शहाणपणाने करत नाही. 

मंगळावर जाण्याची स्वप्न बघणाऱ्या, आर्टिफ़िशिअल इंटेलिजन्समध्ये झेंडे गाडायला निघालेल्या संशोधकांना, तज्ञांना, शास्त्रज्ञांना, त्यांना फंडिंग करणाऱ्यांना, शासनाला या सगळ्यापेक्षा मॅनहोल मध्ये माणसाला उतरावं लागू नये यासाठी काही तंत्रज्ञान प्राधान्याने शोधावं असं वाटत नाही??? 

माणसाचं टू पॉइंट ओ वर्जन येईपर्यंत तंत्रज्ञानाची घौडदौड फ्रीझ करता आली तर? तंत्रज्ञान कशासाठी असावं, कसं वापरावं याविषयी जागतिक पातळीवर काही उहापोह झाला तर? 

Thomas More चं युटोपिया वाचल्यापासून असे काहीबाही विचार मनात यायला लागलेत. 

(माझ्या ब्लॉगचे नोटिफिकेशन मिळत राहण्यासाठी मेल आयडी देऊन सबस्क्राईब करा.)


हाथरस केस

 


मी भाजी घेऊन घरी येत होते. गर्दीचा रस्ता,

दिवसा- उजेडी.. त्यांनी मला फरफटत नेलं. गर्दी बघत राहिली. मला ओरडता आलं नाही. मी घाबरलेले. आता वाटतं ओरडायला हवं होतं. कारण नंतर बुद्धिवान माणसं या घटनेची चर्चा करतील तेव्हा म्हणतील ' ती ओरडली का नाही?'.


त्या कळकट माणसांनी मला एका गावात नेलं. एका झोपडीवजा घरात. त्यांनी माझे बांधलेले डोळे उघडले. त्यांच्या डोळ्यात हवस नाही क्रोध दिसत होता. हे पण मी कुठेतरी लिहून ठेवायला हवं. कारण नंतर बुद्धिवान माणसं या घटनेची चर्चा करतील तेव्हा त्यांना हा वासनेपोटी घडलेला प्रसंग वाटेल. पण मला वासना दिसत नव्हती. तो क्रोध होता. 


त्यांच्या आया बहिणींना असच उचलून नेत आलेले. गावाबाहेर घर, वेगळी भांडी, विलग काम विलग दाम.. अस्वच्छ.. अस्पृश्य.. दुर्लक्षित अन्याय, नोंदी नसलेले गुन्हे.. गुन्हा म्हणून मान्यताच नसलेले गुन्हे.. त्यांच्या विरुद्ध घडत राहिले.. या सगळ्याचा क्रोध.. आणि मी समजूनच घेऊ शकणार नाही अशा असंख्य वंचनांचा क्रोध...


मी त्यांना म्हणाले, मला एक मिनिट बोलू द्या मग काय करायचं ते करा. ते शांत राहिले. 

मी त्यांना म्हणाले,


"स्त्री आणि क्षुद्र असा आपला एकत्र उल्लेख त्या लोकांच्या ग्रंथात आहे. बाई आणि बाटली म्हणून ते मला नशेसोबत जोडतात. मी त्यांची संपत्ती आहे, अब्रू आहे आणि गुलाम सुद्धा आहे. आपण एक व्हायला पाहिजे. आपला शत्रू एक आहे. '


त्यातला एक म्हणाला, "आधी का आली नाहीस? आमची बाजू घेण्यासाठी आम्ही तुला उचलून आणण्याची वाट बघत होतीस ? साली हिप्पोक्रेट.."


मी खडबडून जागी झाले. 


तो गुंड आहे, माहिती आहे



तो गुंड आहे, माहिती आहे. त्याचे डोळेच सांगतात की तो क्रूर, कोल्ड ब्लडेड आहे. अनेक गुन्ह्यांचा तो कर्ताधर्ता आहे. पण कोर्टात काही सिद्ध होणार नाही हेही तितकंच खरं आहे. पण तरी सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांना माहिती असतंच. गावात त्याची चौथाई आहे. पूर्वी तो लपून छपून गोष्टी करायचा. आता तो खिशात कायदा घेऊन फिरतो.

पण आम्ही विरोध करत नाही, डोळेझाक करतो.. का माहिती आहे? कारण तो माणूस आमच्या बाजूचा आहे. उद्या टोकाची परिस्थिती निर्माण झाली ना तरी तो आम्हाला काही करणार नाही. आम्ही त्याच्या नात्यातले आहोत ना. 

पूर्वी आपण गुंडांविरुद्ध उभे राहिलो. चांगलं केलं. पण आता गरज नाही. कारण हा गुंड आपल्या बाजूचा आहे. म्हणून आपण याचे बाजूचे झालो. चांगलं केलं. 

असा माणूस असू नये हे खरं, पण तो जर आपल्या बाजूचा असेल तर त्याच्यासारखं सुख नाही. तो असला म्हणजे आपण अनवेअर-इग्नोरंट राहायला मोकळे. त्याच्या जीवावर माज करायला मोकळे. 

 

माझं जग फोन एवढं.


जगाएवढं मोठं जग होतं माझं, मी लहान असताना

अख्ख गाव माझं घर होतं, मुळात घर लहान असताना...


हळूहळू कळत गेली तहान भूक मोह माया

शेवटाच्या प्रारंभी निव्वळ काया...


माझं घर, माझी माणसं, माझं काम, माझा पैसा

माझ्या माझ्या जगामधला माझा माझा पसारा...


पाऊस माझा पाहुणा होता, वारा वात्रट सवंगडी

वाटा सगळ्या अनोळखी; तरी सहज सुटत चालण्याची कोडी...


माणसांचे दोनच प्रकार होते-अनोळखी नि ओळखीचे

अविश्वासाचा वेढा पडण्याआधी,अबाधित होते राज्य विश्वासाचे...


जग कळत नव्हतं तोवर अख्ख जग माझं होतं

कळत गेलं तसं सारं, माझं मी मोजून घेतलं...


लहान लहान होत होत माझं घर चारच खोल्यांचं झालं

तिथूनही कळेना कधी माझ्या एवढुश्या खोलीत जाऊन सामावलं...


एवढ्याशा फोन मधून जग समजताना माझं जग फोन एवढं,

छोटं छोटं होत होत छोटं छोटं होत गेलं.....


मला काय %@&^% फरक पडत नाही.

 


आमच्या 9वी ‘अ’ चा पट साधारण 72-74 असा काहीतरी होता. त्यातल्या एकूण 20 जणींची नावं सुद्धा मला आता सांगता येणार नाहीत; किंबहुना तेव्हा देखील सांगता आली नसती. आमचा आमचा असा 7-8 जणींचा ग्रुप होता.

पहिली ते पाचवी या इय्यतांसाठी फ्रॉकसारखा गणवेश आणि सहावी ते दहावीसाठी चुडीदारसारखा गणवेश होता. आम्ही नववीत गेलो आणि चौकड्याचा चुडीदार बदलून शाळेने प्लेन चुडीदार केला. नोटीस लागली. मी घरी सांगितलं. आई म्हणाली, ‘ठीक आहे. रविवारी जाऊन नवीन गणवेश घेऊन येऊ.’ दुसऱ्या दिवशी सारिकाचे वडील वर्गशिक्षकांना भेटायला आले.

"अहो आता कुठून आणायचा नवीन ड्रेस? माझ्या मोठ्या पोरगीचा ड्रेस सारिका घालती. हे वर्ष तो गेला असता. आता तुम्ही म्हणता तो राहूदे नवीन घ्या. कशाला? काय वाईटाय आधीच्या ड्रेसमध्ये? का बदलताय?"

"संस्थेचा निर्णय आहे.." आमच्या बाई याहून अधिक काहीच बोलल्या नाहीत.

सारिकासारख्या मुली प्रत्येक वर्गात होत्या. कोणाचा बाप म्हणाला, ‘सोडून दे शाळा’, कोणाचा म्हणाला, ‘घेणार  नाही म्हणून सांग नवीन ड्रेस’, कोणी म्हणलं, ‘पुढच्या महिन्यात घेऊया माझी अंबाबाई’..

सारिका आमच्यात आली. आम्हाला म्हणाली, "आपण सगळ्यांनी मिळून सांगितलं तर ते निर्णय बदलतील. आपण सगळ्या मिळून पत्र देऊ. सहावीत नवीन येणाऱ्या मुलींपासून नवा गणवेश करा म्हणू. आमचा जुन्या मुलींचा दहावीपर्यंत हाच राहू दे. चला आपण मिळून जाऊ बाईंकडं"

आम्हाला तिचं म्हणणं पटलं. पण मिळून जायला आम्ही नकार दिला.

"का गं?" ती म्हणाली.

"कारण नवीन गणवेश आला तरी मला फरक पडत नाही.."

तिनं मग मला पुढं काही विचारलं नाही. शाळेने काही गरीब मुलींना नवीन गणवेशाचं वाटप केलं. त्यात सारिकाला देखील गणवेश मिळाला. मला बरं वाटलं. तो तिला अपरा व्हायचा. गुडघ्याच्या वर बसायचा. सारिका उंच होती ना. पण हळूहळू त्याची सवय झाली.

नववीचं बीजगणित-भूमिती अवघड होतं. त्यात आमचे गणिताचे मास्तर. वर्गात यायचे. गणित फळ्यावर लिहायचे. आणि सरळ गणित सोडवायला घ्यायचे. ‘वहीत उतरवून घ्या’ असं आम्हाला म्हणायचे आणि तासाची घंटा झाली की निघून जायचे. काहीच समजायचं नाही आम्हाला.

मी घरी सांगितलं. बाबांनी मला गणितासाठी शिकवणी लावली. बाबांचं गणित चांगलं आहे माझ्या. त्यामुळं ते पण उजळणी घ्यायचे.

दिपाली मला म्हणाली, "आपण आपल्या वर्गशिक्षकांना सांगूया. काय समजत नाही आम्हाला म्हणून. ते काय शिकवतच नाहीत तर काय समजणाराय?"

मी नकार दिला.

मला तिचं म्हणणं पटलं होतं. पण मिळून वर्गशिक्षकांकडे जायला मी नकार दिला.

"का गं?" ती म्हणाली.

"मला गणिताची शिकवणी आहे ना. शाळेत काही शिकवलं नाही तरी मला फरक पडत नाही.."

दिपाली कोणाकोणला शंका विचारायची, पुन्हा पुन्हा उजळणी करायची, चक्कं उत्तराच्या पायऱ्या पाठ करायची. ती धडपडत शिकत राहिली.

आंतरशालेय एकांकिका स्पर्धा होत्या. अचानक विज्ञानाच्या तासाला संगीताच्या बाई वर्गात आल्या. त्यांनी आमच्या 7-8 जणींची नावं घेतली. माझे उच्चार चांगले होते, सानिका पेटी वाजवायची, कोमल नाचायची छान, पूजा दिसायला सुंदर होती, शलाका आणि अक्षताचा अभिनय चांगला होता. विज्ञानाचा तास चुकवून जायला मिळालं म्हणून मी खुश झाले. ‘संगीत सौभद्र’ चा काही भाग बाई बसवणार होत्या. मी कृष्णाच्या प्रेमात पुन्हा पुन्हा नाटक वाचून तोंडपाठ केलं. मयुरीला बाईनी बोलावलं नव्हतं. ती मला म्हणाली,

"मला संबळ चांगली वाजवता येती. तू ऐकलीयस की. बाईना सांग की”

अगं पण सौभद्रात कशाला हवी संबळ”

मग वेगळं नाटक बसवायला सांगू की. एक वर्ष आड हेच एकच नाटक बसवतात.  आणि संबळ राहू दे. पण त्यांना ऑडीशन घ्यायला सांगू यार. दरवर्षी तुम्हीच नाटक करणार काय. आणि तेच तेच नाटक सारखं. याला काय अर्थय?"

पण मला कृष्ण आवडतो अगं”

कृष्ण आवडतो ना, मग कृष्णाचंच वेगळ कायतर नाटक करूया की. गोपाळकाल्याचं करूया. ती 9 वी ‘फ’ मधली सुरेखाय ना ती पावा भारी वाजवती. तिला घेऊ. नाहीतर अजून कोणाला येत असेल तर बघू. बाकी सगळे बाळगोपाळ. सगळ्यांचं जेवण एकत्र करायचं- झाला काला. ऑडीशन घ्यायला सांगू की गं. वेगळं नाटक करूया की गं”

मला सौभद्र मधली गाणी आवडत असत. आजही आवडतात. बाईंनी मला नाटकात घेतलं होतं. त्यामुळं मला फरक पडत नव्हता. मी मयुरीसोबत गेले नाही.

माझ्याच वर्गातल्या एका मुलीनं नववीत असताना बाईंच्या रागावण्याला घाबरून वर्गात शु केली. त्यानंतर दहावी होईपर्यंत ती शेवटच्या बाकावर एकटी बसायची. एकटी डबा खायची. मधल्या सुट्टीत एकटीच वहीत रेघोट्या मारत बाकावर बसून असायची. तिची आई मला म्हणाली, ‘तिला तुमच्यात खेळायला घेत जा’. मी फार पुढाकार घेतला नाही. मी तिला घेऊया म्हणलं तर मला सुद्धा माझ्या मैत्रिणी सोडून देतील आणि आपण सुद्धा तिच्यासारखे एकटे पडू या भीतीनं मी तिला टाळत राहिले.

वर्षाचं दहावीत असताना लग्न झालं. आम्ही बारावीत गेलो तोपर्यंत तिला एक मुलगा झालेला. ‘अव्वा... तिला बाळ पण झालं!!!’ असं म्हणून मी तोंडावर हात ठेवला.

प्रज्ञाचं 11वी तल्या एका मुलाशी लफडं होतं. अशा वाया गेलेल्या मुलीशी आम्ही बोलायचो नाही. प्रेमात पडून लफडी करणाऱ्या मुलींच्या नादाला लागायचं नाही हे आम्हाला पक्कं ठाऊक होतं. त्यामुळं शाळेत ती एकटी एकटीचं असायची. एखाद्या घाणेरड्या वस्तूकडे पाहावं तसं आम्ही तिच्याकडे पाहत होतो.

"काल शाळेतनं परत जाताना साने गल्लीत एका मुलांनं मला अडवलं. माझा हात धरला. मला खूप भीती वाटतीय. घरी सांगितलं तर पप्पा मला मारतील. सर तुम्हीच काहीतरी करा ना"- संगीता म्हणाली.

सरांनी त्याच गल्लीत राहणाऱ्या शाळेतल्या 3-4 मुलींशी तिची ओळख करून दिली. थोडे दिवस सगळ्याजणी एकत्र जात जावा म्हणून सांगितलं.

एका मवाल्यानं हात धरलेली मुलगी. आम्ही तिच्यापासून चार हात लांबच राहत होतो. तिच्याकडे पाहिलं की काहीतरी अस्वच्छ, घाणेरडी फिलिंग यायची.

स्वरूपा आमच्या ग्रुपमध्ये होती. पण तिच्या घरी जेवायला मात्र ती फक्त मला बोलवायची. आम्ही दोघी जातवाल्या होतो ना. पायल मला म्हणाली, ‘ तू तिला जेवायला येणार नाही म्हणून सांग. बोलावलं तर सगळ्यांना बोलवायला पाहिजे’

मला सगळ्यांच्या घरी जेवायला बोलवत. काही घरात तर जेवणानंतर मला अकरा रुपये, एकवीस रुपये सुद्धा मिळायचे. मी पायलचं बोलणं मनावर घेतलं नाही. मला फरक पडत नव्हता.

आजही पडत नाही. बहुतांश गोष्टी या माझ्यासाठी बातम्या असतात फक्त. निव्वळ एक चर्चेला विषय. मागच्या जन्मीचं पुण्य म्हणून मी या कुळात जन्माला आले. नाव, गाव, आडनाव, आई-वडील... सगळं कसं यथासांग.

इतकं सगळं असूनही मनात कायमची एक भीती आहे. संशयशंकाअविश्वासअसुरक्षितता मनात भरून राहिलेली आहे. असं वाटतं की एखाद दिवस हे सगळं नष्ट झालं तरअचानक हा बँक बॅलन्स- ही इज्जतही सहज मिळणारी संधी- हे सगळे प्रीविलेजेस एकदम नाहीसे झाले तरयांच्याशिवाय मला काय अस्तित्व आहे?!  मग मी पोथ्या वाचतेजप-जाप्य करते. असाच कशाचाही काहीही फरक न पडता मला जगता यावं म्हणून मी देवाची आराधना करतेपत्रिका बघतेहोम हवन करते. ‘हे असंच असतं. मी पूर्व पुण्याईने हे मिळवलेलं आहे’ यावर इतरांचाही विश्वास बसावाश्रद्धा जडावी असं मला वाटतं, कारण तरच माझं स्वार्थीपणाचं हे सगळं जगणं यथासांग सुरळीत चालणार आहे.

‘मी कोणाच्या अध्यात-मध्यात नाही’ हे नक्की अभिमानाने सांगण्याचं वाक्य आहे की खालमानेने सांगण्याचं असा प्रश्न मला पडायला लागलेला आहे. ‘कोणाच्या अध्यात-मध्यात न पडता’ जगण्याची चैन मला परवडते. अराजकीय-अनअवेअर-इग्नोरंट राहण्याची चैन मला परवडते.

ज्या माझ्या नाकर्तेपणाची मला लाज वाटायला पाहिजे ती गोष्ट मिरवायला शिकवणारी ही संस्कृतीहा इतिहासही कलाही सामाजिक-आर्थिक व्यवस्था युगानुयुगे टिकावी.!!!

 


सोशल डायलेमा आणि आई-बाबा ...

 


मी पहिलीत असेन. ताई पाचवीला होती. शाळा सुटली की रोज संध्याकाळी आम्ही गल्लीत खेळत असू. सात वाजता आजी गल्लीतल्या सगळ्या पोरासोरांना गोळा करून शुभंकरोती, मनाचे श्लोक, रामरक्षा, पसायदान म्हणवून घ्यायची. गोष्टी सांगायची. मग आईचा स्वैपाक होईपर्यंत बाबा माझ्याबरोबर खेळायचे किंवा माझं मन रमेल असं बघायचे. दर गुरुवारी आई-बाबा आम्हाला नदीच्या घाटावर फिरायला घेऊन जायचे. अधून मधून इंजुबाई देवीच्या आवारात भूतकांडी खेळायला आम्ही जात असू. अख्खा रविवार अभ्यासाला सुट्टी असायची. पूर्ण वेळ खेळायचं. आई माझ्याबरोबर जिबलीनं खेळायची, बिट्ट्या खेळायची. अगदी आम्ही बहिणी नोकरीला लागल्यानंतर सुद्धा स्क्रॅबल, पत्ते, बॅडमिन्टन, कॅरम असा खेळांचा शिरस्ता चालूच राहिला.

काल सोशल डायलेमा ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर पाहिली. ऑनलाईन माध्यमे बनवण्यामध्ये सहभागी असणाऱ्या तंत्रज्ञांनीच त्या ऑनलाईन माध्यमांचे दुष्परिणाम त्यामध्ये सांगितले आहेत. त्यातला एक जण म्हणाला ‘मी जे ऑफिसमध्ये बनवतो त्याचं व्यसन मला स्वतःलाचं लागलेलं आहे असं माझ्या लक्षात आलं. माझी दोन मुलं मला सारखी बोलवत असतात आणि मी फोन मध्ये दंग असतो.’

कसंय ना, माझ्या लहानपणी सुद्धा मुलांना वेळ न देणारे आई बाबा होते आणि आजही आपल्या मुलांना वेळ देणारे आई बाबा आहेतच की.

एखाद्या गोष्टीचं व्यसन लागणं, एखाद्या माणसाच्या-विचारसरणीच्या आहारी जाणं, आपल्या माणसांना वेळ न देणं, प्रसिद्धीच्या मागे लागणं, अनावश्यक गोष्टींना महत्व देणं, ‘लोक काय म्हणतील’ याचा प्रमाणापेक्षा जास्त विचार करणं... हे माणसाच्या स्वभावात आहे. ऑनलाईन माध्यमांनी  आपल्याला हे शिकवलेलं नाही. त्यांनी आपल्यातल्या उपजत प्रवृत्तीचा फायदा करून घेतला आहे बस. आणि मनुष्याच्या इतिहासातला असा कोणता शोध आहे ज्याचा मनुष्यानं दुरुपयोग केलेला नाही?

व्यसन लागलंय हे मान्य करणं अवघड आहे. एकदा ते मान्य केलं की सोडवणं अवघड नाही. पण आता आपल्या लक्षात आलेलं आहे ना की आपण उगाच फेसबुक आणि इन्स्टा वर स्क्रोल करत बसतो, दिवसातले खूप तास ऑनलाईन माध्यमांमध्ये जातात, आपण जाहिरातींना बळी पडतोय, आपण मनाने एकलकोंडे आणि विचाराने टोकाचे होत चाललोय... आपण स्क्रोल करत राहू असा कंटेंट ही माध्यमे आपल्याला पुरवत राहतात, आपल्या गरजा वाढवून मग त्या गरजांची पूर्तता करणाऱ्या जाहिराती आपल्याला दाखवतात, लाईक-कमेंट-शेअर.. ट्रेंडीग होण्याचं खूळ त्यांनी माझ्या मनात पेरलेलं आहे, मी एकतर्फी कंटेंट वाचत-एकतर्फी व्हिडीओ बघत फार एकसुरी होत चाललीय. आणि हे सगळं साधलं जातंय त्या अल्गोरिदमच्या मदतीने.

बाबा सांगतात त्यांना नाटकांचं फार वेड होतं. पैसे साठवून, कुठच्या कुठे चालत जाऊन ते नाटक बघायचे, रविवारी रस्सा मंडळांमध्ये तांबडा-पांढरा, थोडं कमवायला लागल्यावर मित्रांसोबत पार्ट्या.. मी त्या वयात आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की ‘ते बाबा’ मी कधी पाहिलेलेच नाहीत. मी त्यांचं वाचनाचं वेड पाहिलं, गणिताचं वेड पाहिलं, बागकामाचं वेड पाहिलं. ‘व्यसन लागतंय असं वाटलं तेव्हा सोडून दिलं....’, ‘प्रायोरिटीज बदलतात ना...’, ‘चव कळून, ती आवडून मग ती सोडून देण्यात मजा आहे....’, ‘माझ्या मनावर माझा ताबा असायला पाहिजे ना.. म्हणजे सोपं नाही ते.. पण गोल तो असायला पाहिजे ना....’ साधारण अशा अर्थाच्या सहज वाक्यांनी मला बाबांनी व्यसन करण्यातली आणि व्यसन सोडण्यातली मजा सांगितली. 

सोशल डायलेमामध्ये ते म्हणाले की आपण त्यांचे कस्टमर नाही तर प्रोडक्ट्स आहोत. मोठ्या मोठ्या कंपन्या आपण त्यांच्या वस्तू विकत घ्याव्यात म्हणून आपला डेटा आणि तिथले अल्गोरिदम वापरतात, राजकीय पक्ष प्रोपोगँडा करण्यासाठी ऑनलाईन माध्यमं वापरतात. पण यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. हे ते खूप पूर्वीपासून करत आलेले आहेत. फक्त आता जरिया बदलला आहे एवढच. माणसाने नेहमीच गर्दीला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हिटलरच्या मागे देखील गर्दी उभी राहिली आणि गांधींच्या मागे देखील उभी राहिली. गर्दी मॅन्युप्युलेट  होत आलेलीच आहे. गर्दीसाठी गर्दीलाच उभं राहावं लागेल, कारण आर्थिक मंदी असो,  दंगे असोत, युद्धं असोत.. बळी गर्दीतल्या माणसाचा जातो महालातल्या नाही.

ती डॉक्युमेंटरी नक्कीच अस्वस्थ करणारी आहे पण त्याचवेळी जागं करणारी देखील आहे. माणसाने बनवलेल्या कम्प्युटरशी माणसाला लढता येणार नाही? अल्गोरिदम, डेटा, कम्प्युटर.. मशीन्स प्रेडीक्टेबल आहेत.. माणूस प्रेडीक्टेबल नाहीय ना.! आपल्याला भावना आहेत आणि ही केवढी जमेची बाजू आहे. आपल्यात संवेदनशीलता आहे ही केवढी जमेची बाजू आहे. आपल्यात सद्सदविवेक आहे ही केवढी जमेची बाजू आहे. वरून कोणी कितीही कृत्रिम रोपण केलं तरी आपला आतला आवाज कोणाला हॅक करता येऊ शकत नाही. एक असं सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक  वातावरण आपण तयार करू शकलो जिथे आप्तेष्ट आहेत, छंद आहेत, गुंगून जाता येईल अशा स्वैपाकापासून-साफसफाईपासून-बासरी वाजवण्यापर्यंत अनेक गोष्टी आहेत, जिथे शांतता प्रिय आहे, जिथे द्वेष वर्ज्य आहे तर कुणाची बिशाद आहे आपल्याला विकत घेतील, तालावर नाचवतील!!

मी कदाचित थोडी ऑप्टीमिस्टिक वाटत असेन .. आहेही.. पण कोण नाही? आपण सगळेच ऑप्टीमिस्टिक आहोत. आणि तोच आपल्यातला सर्व्हावल इंस्टिंक आहे.